बीड : विविध जाती-धर्मातील ६०० जणांनी रविवारी येथे एकाच वेळी धर्मांतर करून बौद्धधम्माची दीक्षा घेतली. सत्यशोधक समाज महासंघाच्या पुढाकारातून हा धम्मदीक्षा सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला. येथील सामाजिक न्यायभवनाच्या प्रांगणात पार पडलेल्या या कार्यक्रमास डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू व रिपब्लिकन सेनेचे संस्थापक आनंदराज आंबेडकर यांची प्रमुख उपस्थिती होती. भन्ते उपगुप्त महाथेरो, सत्यशोधक समाज महासंघाचे अध्यक्ष जी.एस. कांबळे, रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय सरचिटणीस संजीव बोधनकर, बाबासाहेब अहिरे, प्रा. दादासाहेब जोगदंड, डॉ. जी. के. डोंगरगावकर, डी. एस. नरसिंगे, डॉ. दिलीप खंदारे, लक्ष्मीकांत शिंदे, संदीप उपरे आदी मंचावर उपस्थित होते. भन्ते उपगुप्त महाथेरो यांनी धर्मांतर करणाऱ्या ६०० जणांना बौद्ध धम्माची दीक्षा दिली. यावेळी २२ प्रतिज्ञा देण्यात आल्या. धम्मांतर करणाऱ्यांमध्ये दलित समाजातील विविध जातींमधील नागरिकांची संख्या सर्वाधिक आहे. हे धर्मांतर करताना कोणालाही बळजबरी केलेली नाही. ज्या कुटुंबियांनी धर्मांतर केले, ते स्वत:हून आल्याचे सत्यशोधक समाज महासंघाचे अध्यक्ष जी.एस. कांबळे यांनी सांगितले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सत्यशोधक समाज महासंघाचे जिल्हाध्यक्ष धर्मराज मुजमुले, सत्यशोधक ओबीसी परिषदेचे राज्य संघटक अमरसिंह ढाका, अनिल गायकवाड, अॅड. किशोर कसबे, सतीश कसबे यांनी परिश्रम घेतले.बौद्ध धम्म स्वीकारणाऱ्या कुटुंबियांसोबत रोटी-बेटी व्यवहार केले जातील, त्यांना सामाजिक प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी आपण त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू, अशी ग्वाही आनंदराज आंबेडकर यांनी दिली. समता आणि बंधुता फक्त बौद्ध धम्मात आहे. त्यामुळे इतरधर्मीय बौद्ध धम्माकडे आकर्षित होत असल्याचे ते म्हणाले. (प्रतिनिधी)
बीडमध्ये ६०० जणांचे धर्मांतर
By admin | Updated: February 8, 2016 00:24 IST