अनिल महाजन, धारुर ‘झाडे लावा, झाडे जगवा, ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ यासारखे अनेक संदेश शासनाच्या माध्यमातून दिले जातात. मात्र याची प्रत्यक्षात अंमलबजावणी होत नाही. परंतु येथील वनपरिक्षेत्र कार्यालयाने सुमारे ६० हजार रोपे तयार करुन इतर कार्यालयासमोर आदर्श निर्माण केला आहे. लवकरच ही रोपे लोकार्पण केले जाणार असून, याचे मोफत वाटप करण्यात येणार आहे. धारुर येथील वनपरिक्षेत्र कार्यालयाने येणार्या पावसाळ्यात वृक्षारोपण करण्यासाठी मागील सात महिन्यांपासून जोपासलेली ६० हजार रोपे लागवडीसाठी सज्ज झाली आहेत. भर उन्हाळ्यात येथील कर्मचार्यांनी याची निगराणी केली. तालुक्यात दोन ठिकाणी रोपवाटिका तयार करण्यात आल्या आहेत. यामध्ये धुनकवड व आरणवाडी यांचा समावेश आहे. सात महिन्यांपासून रोपांच्या लागवडीपासून ते त्यांच्या जोपासण्यापर्यंतचे काम येथील कर्मचार्यांनी चोखपणे बजावले आहे. आरणवाडी येथील रोपवाटिकेत मग्रारोहयोतून ६० हजार रोपे तयार करण्यात आली आहेत. याचे संवर्धन करण्यात येत असून, ही रोपे एक महिन्यानंतर लागवडीसाठी उपयुक्त ठरणार आहेत. या रोपांचे वृक्षारोपण वन विभागाच्या जमिनीत व गरजूवंत शेतकर्यांसाठी मोफत देण्यात येणार आहेत. यामध्ये सीताफळ, शेपू, आवळा, काचन, शिवण, चिंच, करज, काशीद, अमलतास, लिंब आदी झाडांची रोपे जोपासण्यात आली आहेत. येथे सात महिन्यांपासून १० ते १५ मजुरांसह वनपरिक्षेत्र कार्यालयाचे अधिकारी, कर्मचारी काम करीत आहेत. अधिकारी, कर्मचार्यांनी लक्ष दिल्यामुळे ही रोपे हिरवीगार दिसू लागली आहेत. वन परिक्षेत्र अधिकारी आर.बी. शिंदे, वनपाल ए.एन. काकडे, वन कर्मचारी संभाजी पारवे आदी कर्मचार्यांनी येथे परिश्रम घेतले. ज्यांना रोपांची आवश्यकता आहे अशांनी वनपरिक्षेत्र कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ही रोपे मोफत उपलब्ध होणार असल्याने शेतकर्यांतून समाधान व्यक्त होत आहे.
धारूर येथे ६० हजार रोपे लागवडीसाठी सज्ज
By admin | Updated: May 24, 2014 01:34 IST