रामनगर : जालना तालुक्यातील वडीवाडी येथे शेळ्यांच्या गोठ्यास गुरुवारी रात्री अचानक आग लागल्याने घरगुती सामान खाक झाले तर ६ शेळ्यांचा या आगीत होरपळून मृत्यू झाला.वडीवाडी येथील शेतमजूर शेतकरी मदन म्हस्के यांनी सततच्या दुष्काळामुळे अल्प शेतीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह तसेच मुलांचे शिक्षण हे होत नसल्याने जोडधंदा म्हणून शेळीपालन सुरू केले होते. दुष्काळामुळे खर्चही निघाला नाही. शेळीपालनाचा व्यवसाय वाढवून यातून कुटुंबास हातभार लागेल, अशीच धारणा मनाशी बाळगून त्यांनी शेळ्या वाढविण्यासही सुरूवात केली होती. एकीकडे दुष्काळाने अडचणीत सापडले असतानाच गुरुवारी रात्री शेळ्यांच्या गोठ्यास आग लागल्याने यामध्ये घरगुती साहित्य, चारा, धान्य जळाले. शिवाय ६ शेळ्यांचाही त्यात मृत्यू झाला. महसूल विभागामार्फत सदरील घटनेचा शुक्रवारी सकाळी पंचनामा करण्यात आला.शेळ्यांसह गोठ्याचे छप्पर, घरगुती साहित्य जळाल्याने ९० हजार रुपयांचे नुकसान झाल्याचे मंडळ अधिकारी रमेश घुले, तलाठी एस.डी. धन्ने यांनी सांगितले. यावेळी ग्रामसेवक जे. बी. बोरकरसह ग्रामस्थांची उपस्थिती होती.दुष्काळात घडलेल्या या घटनेने म्हस्के कुटुंबाचे मोठे नुकसान झाल्याचे ज्ञानेश्वर सोनवणे, विष्णू चव्हाण यांनी सांगितले. शासनामार्फत झालेल्या नुकसानीची भरपाई म्हस्के यांना त्वरित मिळावी, अशी मागणीही यावेळी ग्रामस्थांनी केली. (वार्ताहर)
आगीत ६ शेळ््यांचा मृत्यू
By admin | Updated: February 13, 2016 23:55 IST