रऊफ शेख, फुलंब्री फुलंब्री तालुक्यातील दीड हजार शेतकर्यांना विविध अनुदानापोटी दिलेले ५४ लाखांचे धनादेश गेल्या सहा महिन्यांपासून घरात पडून असून, ते तात्काळ बँकेत टाकण्यासाठी तहसीलदारांनी शेतकर्यांना दोन दिवसांची मुदत दिली आहे. फुलंब्री तालुक्यातील ज्या गावांची आणेवारी ५० पैशांपेक्षा कमी आहे, अशा गावातील शेतकर्यांना आर्थिक मदत देण्यात आली. फुलंब्री तालुक्यात ४५ हजार शेतकर्यांना १३ कोटी रुपयांचे वाटप करण्यात आले होते. हे वाटप गेल्या आठ महिन्यांपासून सुरू होते. तालुक्यातील १ हजार ८०० शेतकरी असे आहेत, ज्यांनी धनादेश नेला; पण बँकेत टाकला नाही व घरातच ठेवला. त्याची एकूण रक्कम ५४ लाख इतकी आहे. तहसील कार्यालयाकडून सर्वच रक्कम बँकेत टाकण्यात आली; पण शेतकर्यांनी बँकेतून पैसे काढले नाहीत. तहसीलदारांनी याबाबत शेतकर्यांना सूचना केली असून, आपले धनादेश येत्या दोन दिवसांत बँकेत जमा करून पैसे घ्यावेत, नसता बँकेतील रक्कम परत जाणार असल्याचे तहसीलदार रेवणनाथ लबडे यांनी सांगितले.एकीकडे सरकारी अनुदान वेळेवर मिळत नाही किंवा अद्यापपर्यंत आलेच नाही, अशी ओरड शेतकर्यांकडून केली जात असतानाच फुलंब्री तालुक्यातील शेतकर्यांचा नाकर्तेपणा यामुळे दिसून आला आहे. दोन दिवसात या शेतकर्यांनी धनादेश न वटविल्यास त्या रकमेवर त्यांना पाणी सोडावे लागले. ‘दैव देते अन् कर्म नेते’ या म्हणीचा प्रत्यय यावेळी येऊ शकतो. त्यामुळे संबंधित शेतकर्यांनी तात्काळ बँक गाठणे गरजेचे आहे.
५४ लाखांचे धनादेश बळीराजाकडेच पडून!
By admin | Updated: May 31, 2014 01:25 IST