साहेबराव हिवराळे, औरंगाबाद दुष्काळाशी सामना करत असताना सातारा तांड्यावरील युवा शेतकऱ्याने दोन एकरांत ३५० क्विंटल कांद्याचे उत्पादन घेतले खरे. मात्र अवघ्या दोन रूपयांचा भाव मिळाल्याने भर दुष्काळात कांद्यानेही वांधा केला. पस्तीशीतील गणेश पवार हा पदवीधर युवक. यंदा वाटण्या झाल्या आणि त्याच्या वाट्याला दोन एकर शेती आली. आई-वडील, तीन मुले आणि नवरा-बायको, हे त्याचे कुटुंब. सातारा परिसरात शक्यतो कोणीही कांदा उत्पादन घेत नाही; परंतु मार्केटमध्ये कांद्याचा भाव वाढल्याने नगदी पीक म्हणून गणेशने हिंमत केली. शेतीचा कारभार हाती घेताच गणेशने सर्वच्या सर्व दोन एकरात कांद्याची लागवड केली. सोसायटीतून साडेपाच लाखांचे कर्ज काढले. वैजापुरातून गुणवत्तेचे बियाणे आणले. पीकही चांगले आले. दुष्काळाचे दिवस असताना दिवस-रात्र एक करून कांदा वाढविला. दोन एकरात ३५० क्विंटल कांदा निघाला. शेतात माल निघाला की भाव नसतो आणि भाव असले की शेतात माल नसतो. जे इतर शेतकऱ्यांचे होते तेच गणेशचेही झाले. जाधववाडीच्या बाजारात २१० रूपये प्रती क्विंटलला भाव मिळाला.
३५० क्विंटल कांदा होऊनही पैशांचा वांधा
By admin | Updated: May 8, 2016 01:09 IST