राम तत्तापुरे , अहमदपूर दोन महिन्यांपूर्वी महाराष्ट्रासह तालुक्यामधील शेतकर्यांचे गारपिटीमुळे पिकांचे अतोनात नुकसान झाले होते. त्याच्या भरपाईपोटी महाराष्ट्र शासनाच्या वतीने तालुक्यातील गारपीटग्रस्त शेतकर्यांना ३२ लाख ५ हजार रुपयांची मदत त्यांच्या खात्यावर जमा करण्यात आली आहे. गेल्या दोन महिन्यांपूर्वी महाराष्ट्रासह अहमदपूर तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात कधी नव्हे, एवढे गारपिटीमुळे शेतकर्यांच्या रबी पिकांचे अतोनात नुकसान झाले होते. यात तालुक्यातील देवकरा, रोकडा सावरगाव, धानोरा (बु.), सताळा, नांदुरा (बु.), माळेगाव (खुर्द), थोडगा, जांब, किनीकदू, कोकणगा, सावरगाव थोट, धानोरा (खुर्द), तीर्थ, उन्नी, हासर्णी, मोघा, सिंदगी (बु.), सांगवी सुनेगाव, वंजारवाडी, राळगातांडा, वडारवाडी, खंडाळी, उजना, गंगाहिप्परगा, सिंदगी (खुर्द), ब्रह्मवाडी, नागझरी अशा ३० गावच्या डाळिंब, द्राक्ष, टरबूज, कांदा, टोमॅटो, हरभरा, गहू, करडई, जोंधळ्यासह रबी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. शासनाच्या सूचनेप्रमाणे मंडळ अधिकारी यांच्या वतीने पंचनामे होऊन त्यांच्या नावे बँकेत रक्कम जमा करण्यात आली आहे. यामध्ये एकूण ५२१ शेतकरी असून, याचा पहिला हप्ता १४ लाख रुपयांचा तर ३३४ शेतकर्यांच्या खात्यावर १८ लाख ५ हजार रुपयांचा दुसरा हप्ता नुकताच जमा करण्यात आला आहे. यावेळी तहसीलदार विक्रम देशमुख म्हणाले, महसूल विभागामार्फत पंचनामे करण्यात आले. त्याद्वारे होणारी सर्व मदत खातेदारांच्या नावे जमा करण्यात आल्याची माहिती ‘लोकमत’शी बोलताना त्यांनी दिली.
गारपीटग्रस्तांना शासनाकडून ३२ लाख रुपयांची मदत
By admin | Updated: May 22, 2014 00:12 IST