बीड : जिल्हा परिषदेच्या वतीने ग्रामपंचायत स्तरावर नेमणूक करण्यासाठी गट अभियंता व पंचायत अभियंत्याची भरती प्रक्रिया राबविली होती़ या सर्वांची रविवारी कौशल्य चाचणी घेण्यात आली़ यावेळी ३१ उमेदवार अपात्र ठरले़राजीव गांधी सशक्तीकरण अभियानांतर्गत ग्रामपंचायत स्तरावर विविध विकास कामे करण्यासाठी गट अभियंता व पंचायत अभियंता यांची कंत्राटी स्वरूपात नेमणूक करण्यात येणार आहे़ त्यासाठी सप्टेंबर २०१४ मध्ये गट अभियंते व पंचायत अभियंत्याची लेखी परीक्षा घेण्यात आली होती़ नियुक्त्या देण्यापूर्वी कौशल्य चाचणी घेणे अनिवार्य आहे़ त्यानुसार रविवारी दुपारी तीन वाजता जि़ प़ मध्ये तज्ज्ञांच्या उपस्थितीत चाचणी पार पडली़ यावेळी ११ पैकी २ गट अभियंते अपात्र ठरले तर ४१ पंचायत अभियंत्यांपैकी २९ जण अपात्र ठरले़यावेळी सीईओ नामदेव ननावरे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी नईमोद्दीन कुरेशी, सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी आऱ आऱ भारती, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता एस़ आऱ शेंडे, लघु पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता पी़ डी़ खंदारे, सहायक प्रशासन अधिकारी रवींद्र तुरूकमारे, कनिष्ठ प्रशासन अधिकारी संतोष गायकवाड यांनी मुलाखती घेतल्या़यावेळी लिपिक, लेखापाल, कार्यालयीन सहायक, परिचर यांच्याही मुलाखती पार पडल्या़ (प्रतिनिधी)
कौशल्य चाचणीत ३१ अभियंते अपात्र
By admin | Updated: December 29, 2014 00:57 IST