औरंगाबाद : घाटी रुग्णालयातील मनोविकृती वॉर्ड गेल्या दोन वर्षांपासून बंद आहे. आंतररुग्ण विभागाअभावी अधिक उपचारासाठी रुग्णांना थेट पुणे येथील येरवडा प्रादेशिक मनोरुग्णालयात पाठविले जाते. परिणामी गोरगरीब रुग्णांना उपचारासाठी मोठ्या अडचणींना तोंड द्यावे लागत आहे.धावपळीच्या आजच्या युगात अनेक कारणांमुळे मनोविकृतीसारख्या आजाराला सामोरे जाण्याची वेळ अनेकांवर येत आहे. खाजगी रुग्णालयातील उपचार परवडणारे नसल्याने त्यासाठी घाटी रुग्णालयाचा मोठा आधार मिळतो. गेल्या दोन वर्षांपासून घाटीतील मनोविकृती वॉर्ड बंद असल्याने त्यांची गैरसोय होत आहे. घाटीतील वॉर्ड क्रमांक ७ मध्ये मनोरुग्णांवर उपचार केले जात होते; परंतु या वॉर्डाच्या इमारतीची दुरवस्था झाली. ठिकठिकाणी गळती होत असल्याने रुग्णांची गैरसोय होत होती. अशा परिस्थितीत या वॉर्डातील सिलिंगचा काही भाग पडला. तेव्हापासून या वॉर्डात रुग्णांची भरतीच बंद करण्यात आली. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे हा वॉर्ड सुरू करण्यास अडचणी येत आहेत.
महिन्याला ३० मनोरुग्ण पुण्याकडे
By admin | Updated: June 20, 2016 00:57 IST