लातूर : केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या लातूर प्रशिक्षण केंद्रातून आतापर्यंत ४४०९ जवानांना प्रशिक्षण देण्यात आले असून, बुधवारी आठव्या तुकडीचा दीक्षांत सोहळा झाला. तब्बल ४४ आठवड्यांच्या खडतर प्रशिक्षणातून हे जवान देशसेवेसाठी सज्ज झाले आहेत. या जवानांना देशसेवेची शपथ देण्यात आली.यावेळी पोलिस उपमहानिरीक्षक संजय लाटकर यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पोलिस उपमहानिरीक्षक तथा प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य बी.एन. सिंह उपस्थित होते. यावेळी जवानांना उपकमांडंट महेंद्र हेगडे यांनी कर्तव्याची शपथ दिली. आतापर्यंत या प्रशिक्षण केंद्रातून ४४०९ जवानांना खडतर प्रशिक्षण देण्यात आले. आठव्या तुकडीतील २७६ जवानांनाही ४४ आठवड्यांचे खडतर प्रशिक्षण देऊन आतंकवादी व नक्षलवाद्यांसोबत लढण्याचे मनोबल दिले आहे. एके-४७, इन्सास रायफल, मॉर्टर आणि पिस्टलसह अत्याधुनिक प्रशिक्षण देण्यात आले. जंगलातील लढाईबाबतही प्रशिक्षण देण्यात आले असून, लातूरच्या प्रशिक्षण केंद्रातून तयार झालेले ४४०९ जवान देशात ठिकठिकाणी कर्तव्यावर तैनात झाले असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
लातूर प्रशिक्षण केंद्रातून २७६ जवान देशसेवेसाठी तैनात
By admin | Updated: November 19, 2015 00:23 IST