मोबीन खान ,वैजापूरभीषण पाणीटंचाईचा सामना करणाऱ्या वैजापूर तालुक्यावर अस्मानीनंतर सुलतानी संकटही घोंगावत आहे. तालुक्यात सप्टेंबर ते जानेवारीदरम्यान तपासणी करण्यात आलेल्या ३३६ पैकी २३४ पाणी नमुने दूषित आढळल्याने खळबळ उडाली आहे.सलग तीन वर्षांपासून दुष्काळाचा सामना करणाऱ्या वैजापूर तालुक्याला यावर्षीही पावसाने दगा दिला. ऐन हिवाळ्यात तालुक्यातील विविध जलस्रोत आढळल्याने भीषण पाणीटंचाई निर्माण होत आहे. सदर पाणीटंचाईवर मात करण्यासाठी प्रशासनाकडून टँकरचा उपाय शोधला जात आहे; परंतु या टँकरसाठी वापरण्यात येणाऱ्या पाण्याची गुणवत्ता तपासण्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात आल्याने आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण होत आहे. तालुका आरोग्य विभागाकडून १५ सप्टेंबर ते ३१ जानेवारी २०१५ दरम्यान विविध भागातून ३३६ पाण्याचे नमुने गोळा करण्यात आले. येथील उपजिल्हा रुग्णालयात या पाण्याचे परीक्षण केले असता त्यातील २३४ पाणी नमुने दूषित आढळले आहेत. सदर दूषित पाण्याचा अहवाल संबंधित विभागाला पाठविण्यात आल्याची माहिती कार्यालयीन सूत्रांनी दिली. या अहवालानंतरही प्रशासन ढिम्म असल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. तालुक्याच्या विविध भागातून सध्या टँकरची मागणी वाढत आहे. अशा वेळी टँकर मंजूर करून देण्याचे अधिकार तहसीलदारांना देण्यात आले आहेत; परंतु सदर टँकरसाठी वापरण्यात येणारे पाणी पिण्यायोग्य आहे किंवा नाही याची खातरजमा होताना दिसत नाही. पाणी पुरवठ्याच्या नावाखाली दूषित पाण्याचा पुरवठा करून प्रशासन आपले कोणते कर्तव्य पूर्ण करीत आहे हे समजायला मार्ग नाही. तालुक्यातील २६ गावांना ३३ टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे, तर काही गावांचे प्रस्ताव तहसील कार्यालयात मंजुरीसाठी पाठविण्यात आले आहे. लवकरच या प्रस्तावांना मान्यताही मिळेल; परंतु या टँकरमधून होणारा पाणीपुरवठा सर्वसामान्यांसाठी धोकादायक ठरू नये यासाठी उपाययोजना गरजेच्या आहेत. या प्रकरणी माहिती घेण्यासाठी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अरविंद हरबडे यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.
३३६ पैकी २३४ पाणी नमुने दूषित
By admin | Updated: March 3, 2015 00:29 IST