उस्मानाबाद : समाजकल्याण विभागाकडून विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात येते. या माध्यमातून पात्र ठरलेल्यांपैकी तब्बल २० हजार २३९ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे २१ कोटी ८९ लाख ९१ हजार रुपये वाटप करण्यात आहेत. ही माहिती समाज कल्याण विभागाच्या वतीने देण्यात आली आहे. त्यामुळे आर्थिकदृष्टया दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.भारत सरकार तर्फे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना देण्यात येणारी शिष्यवृत्तीचे दोन वर्षापासून ई- शिष्यवृत्तीमध्ये रूपांतर करण्यात आले. यात वरिष्ठ आणि कनिष्ठ महाविद्यालयांच्या सर्व व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या महाविद्यालयातील अनुसूचित जाती, इतर मागास प्रवर्ग, विशेष मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना सदरील शिष्यवृत्तीचा लाभ घेता येतो. यामध्ये शैक्षणिक साहित्य तसेच प्रवासखर्च कारणांसाठी ही शिष्यवृत्ती दिली जाते. सदरील शिष्यवृत्ती समाजकल्याण विभागातर्फे देण्यात येते. चालू वर्षी जिल्हाभरातील २०९ महाविद्यालयामधून २१ हजार ८८४ विद्यार्थ्यांनी ई शिष्यवृत्तीसाठी आॅनलाईन अर्ज दाखल केले होते. यातील २० हजार २३९ विद्यार्थ्यांच्या खात्यावर २१ कोटी ८९ लाख ९१ हजार रुपये शिष्यवृत्ती जमा केली असूृन, उर्वरित विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती खात्यावर जमा करण्याची प्रक्रिया सुरु असल्याचे समाज कल्याण विभागाच्या वतीने सांगण्यात आले. दरम्यान, उर्वरित विद्यार्थ्यांनाही तातडीने शिष्यवृत्तीचे वाटप होणे आवश्यक आहे. तशी मागणीही लाभार्थ्यांच्या पालकांकडून होत आहे. (प्रतिनिधी)
शिष्यवृत्तीचे २१ कोटी वाटप
By admin | Updated: August 10, 2015 00:57 IST