जालना : पंतप्रधान जनधन योजनेअंतर्गत जिल्ह्यात आतापर्यंत १ लाख ५० हजार २७३ जणांचे खाते उघडण्यात आले असून गाव पातळीवर आर्थिक चळवळ अधिक गतीमान करणारी ही योजना असल्याचे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी केले. प्रजासत्ताक दिनी जिल्हा पोलिस मुख्यालयाच्या मैदानावर पालकमंत्री लोणीकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्याप्रसंगी जनतेला शुभेच्छा संदेश देताना ते बोलत होते. यावेळी आ. राजेश टोपे, आ. अर्जुनराव खोतकर, आ. नारायण कुचे, जि.प. अध्यक्ष तुकाराम जाधव, उपाध्यक्ष अनिरुद्ध खोतकर, नगराध्यक्षा पार्वताबाई रत्नपारखे, उपाध्यक्ष शाह आलमखान, जिल्हाधिकारी ए.एस.आर. नायक, पोलीस अधीक्षक ज्योतिप्रिया सिंह, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी प्रेरणा देशभ्रतार, अतिरिक्त पोलीस अधीक्षक गेडाम यांची प्रमुख उपस्थिती होती. लोणीकर पुढे म्हणाले की, जनधन योजनेसाठी ज्यांनी अद्याप खाते उघडले नाहीत, त्यांनी ते तातडीने उघडावेत. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी शासनाने जिल्ह्याला १२३ कोटी रुपयांचा प्रथम हप्ता दिला आहे, असे ते म्हणाले. याप्रसंगी जिल्हाधिकारी नायक, जि.प.चे उपाध्यक्ष अनिरुद्ध खोतकर, जि.प. च्या मुख्य कार्यकारी अधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते उत्कृष्ट कार्याबद्दल सत्कार करण्यात आला. तसेच राष्ट्रपती पोलीस पदक प्राप्त सहाय्यक पोलीस निरीक्षक देवजी भगवान काकडे यांचाही सत्कार करण्यात आला. (प्रतिनिधी)
‘जनधन’ साठी दीड लाख लाभार्थींचे खाते
By admin | Updated: January 28, 2015 00:55 IST