औरंगाबाद : पाऊस लांबल्यामुळे मराठवाड्यातील पाणीटंचाईची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत आहे. आतापर्यंत विभागातील १,२४९ गावे पाणीटंचाईच्या फेऱ्यात सापडली आहेत. यातील ६५० गावांना टँकरने, तर उर्वरित गावांना विहीर अधिग्रहित करून पाणीपुरवठा केला जात आहे. विभागात पाणीपुरवठा करणाऱ्या टँकरची संख्या या आठवड्यात तब्बल ५२६ वर पोहोचली आहे. मराठवाड्यात जानेवारी महिन्यापासून पाणीटंचाई जाणवू लागली होती. मात्र, आता ही टंचाई आणखी भीषण झाली आहे. त्यात पाऊस लांबल्यामुळे टंचाईग्रस्त गावांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. मागील आठवड्यात मराठवाड्यात ८९३ गावांमध्ये टंचाई होती. या आठवड्यात ही संख्या १,२४९ झाली आहे. सध्या विभागात बीड जिल्ह्यात सर्वाधिक ५०० गावे आणि वाड्या पाणीटंचाईचा सामना करीत आहेत. त्यापाठोपाठ औरंगाबाद आणि उस्मानाबाद जिल्ह्यातही टंचाईग्रस्त गावांची संख्या मोठी आहे. विभागातील ६५० गावांना सध्या टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. औरंगाबाद जिल्ह्यात २३३ टँकर सुरू आहेत. जिल्ह्यातील १५४ गावांना या टँकरद्वारे पाणी पुरविले जात आहे. बीड जिल्ह्यातही १७२ टँकर सुरू असून त्या ठिकाणी १४८ गावे आणि २११ वाड्यांना टँकरने पाणी पुरविले जात आहे. परभणी जिल्ह्यात मात्र अद्याप टँकर सुरू करण्याची गरज भासलेली नाही. अनेक ठिकाणी गावातच विहीर अधिग्रहित करून पाणी उपलब्ध करून देण्यात आले आहे. सद्य:स्थितीत विभागात ८४१ गावांमध्ये एकूण १,०५१ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. यापैकी २६२ विहिरी टँकरमध्ये पाणी भरण्यासाठी अधिग्रहित केल्या आहेत. उर्वरित विहिरी या त्या त्या गावातच असल्यामुळे नागरिकांना त्यावरूनच पाणी भरता येत आहे. बीड जिल्ह्यात सर्वाधिक ३७४ विहिरी अधिग्रहित केल्या आहेत. औरंगाबाद जिल्ह्यात २८४, लातूर जिल्ह्यात १०६ आणि उस्मानाबाद जिल्ह्यात १९६ विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत. टँकरची संख्याजिल्हाटँकरऔरंगाबाद२३३जालना२८परभणी००हिंगोली०१नांदेड२०बीड१७२लातूर०७उस्मानाबाद६५एकूण५२६
१,२४९ गावे टंचाईच्या फेऱ्यात
By admin | Updated: June 23, 2014 00:31 IST