परळी : येथील बायपास रस्ता व भूसंपादनासाठी शुक्रवारी ११ कोटी रूपयांचा निधी उपलब्ध करण्यात आला. त्यामुळे बायपास प्रश्न गतीने मार्गी लागणार आहे.पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी बायपास रस्त्याच्या कामाचा प्रश्न हाती घेतला होता. भूसंपादन व तांत्रिक बाबीत अडकून पडलेल्या बायपासच्या कामाला निधीच्या कमतरतेमुळे खीळ बसली होती. चार किलोमीटर लांबीच्या रस्त्याच्या कामासाठी आठ कोटी तर भूसंपादनासाठी तीन कोटी रूपये असे मिळून ११ कोटी रूपये मंजूर करण्यात आले आहेत. त्यामुळे परळीकरांना दिलासा मिळाला आहे. निधीच्या उपलब्धतेमुळे बायपासचे काम तत्परतेने पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी दिलेल्या पत्रकाद्वारे दिली आहे. बायपासमुळे वाहतूक कोंडी कमी होणार असून अपघाताचा धोका टळणार आहे. (वार्ताहर)
परळी बायपासला ११ कोटींचा निधी
By admin | Updated: April 4, 2015 00:35 IST