नांदेड : विष्णूपुरी प्रकल्पात सध्या १०़ ४१ दलघमी पाणीसाठा उपलब्ध असून नांदेड शहराला जुलै अखेरपर्यंत हे पाणी पुरणार आहे़ पावसाचे दोन नक्षत्र कोरडे गेल्यानंतर प्रकल्पातील पाणीपातळीत दिवसेंदिवस घट होत आहे़ मागील वर्षी १ ते १९ जून या कालावधीत जिल्ह्यात एकूण २२९०़६३ मि़ मी़ तर १४३़१६ एवढे सरासरी पर्जन्यमान झाले होते़ मात्र यंदा आजपर्यंत नांदेड जिल्ह्यात एकूण २५़३४ मि. मी़ पाऊस झाला आहे़ त्यामुळे विष्णूपुरी प्रकल्पातील साठा भरण्याऐवजी कमी होत चालला आहे़ सध्या १०़४१ दलघमी साठा असून ३४८़३० पाणीपातळी आहे़ प्रकल्पात एकूण १३़२६ टक्के साठा आहे़ उपलब्ध साठा जुलैअखेर पर्यंत पुरणार असला तरी पावसाची प्रतीक्षा सर्वांनाच आहे़ मागील दोन वर्षापासून अल्पपावसामुळे विष्णूपुरी प्रकल्पातील उपलब्ध असलेल्या पाण्याचे नियोजन करण्यात येत आहे़ ऐन उन्हाळ्यात दोन ते तीन दिवसाआड पाणी सोडावे लागले़ यावर्षी पावसाने सरासरी ओलांडल्यामुळे विष्णूपुरी प्रकल्पात ७५ टक्के पाणीसाठा उपलब्ध झाला होता़ उपलब्ध पाणी जून महिन्यापर्यंत पुरविण्यासाठी जानेवारीपासून एक दिवसाआड पाणी सोडण्यात येत आहे़ १ मार्च रोजी विष्णूपुरी प्रकल्पात २३ दलघमी पाणीसाठा तर १४ मार्च रोजी प्रकल्पात ३६़५७ दलघमी साठा होता़ तर २६ मे रोजी १८ दलघमी पाणी उपलब्ध होते़मागील वर्षी २०१३ मध्ये पावसाने साथ दिल्यामुळे जवळपास पेरण्या संपल्या होत्या़ यावर्षी पावसाने पाठ फिरवल्याने शेतकरी चिंतेत आहे़ मृग नक्षत्र कोरडे गेल्याने शेतकऱ्यांचे आर्द्रा नक्षत्राकडे डोळे लागले आहेत़त्यात काही शेतकऱ्यांनी पावसाच्या आशेने पेरण्याही उरकल्या आहेत़ त्यांची मात्र गोची झाली आहे़ (प्रतिनिधी) विष्णूपुरी प्रकल्पाची सुरक्षा वाऱ्यावरवरिष्ठ अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे विष्णूपुरी प्रकल्पाची सुरक्षा वाऱ्यावर आहे़ प्रकल्पाच्या ठिकाणी विद्युत पुरवठा खंडित असल्याने रात्रीच्या वेळी हा परिसर असुरक्षित आहे़ सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने प्रकल्पाच्या सुरक्षेसोबतच सुविधांच्या संदर्भात लक्ष देणे आवश्यक आहे़ परंतु याठिकाणी कार्यरत कर्मचाऱ्यांना असुविधांना सामोरे जावे लागत आहे़ याकडे अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष झाले आहे़
विष्णूपुरीत १० दलघमी पाणी
By admin | Updated: June 23, 2014 00:04 IST