चंद्रपूर : भारतीय परिवार बचाव संघटना (सेव्ह इंडियन फॅमिली फाऊंडेशन) तर्फे पत्नी पिडीतांच्या समस्या जाणून घेण्यासाठी चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष डॉ. नंदकिशोर मैंदळकर, प्रमुख पाहुणे सहकार शिक्षणाधिकारी नरेंद्र पिंपळकर, संस्थेचे कायदे विषयक सल्लागार अॅड. संदीप नागपुरे, डॉ. राहुल विधाते, शीतल साळवे आदी उपस्थित होते. पत्नी पीडितांनी चर्चासत्रात सहभाग घेतला. यावेळी विचाराचे आदानप्रदान झाले. कायदेविषयक मार्गदर्शन अॅड. संदीप नागपुरे यांनी केले. चंद्रपूर येथे कौटुंबिक न्यायालय फास्ट ट्रॅक कोर्टच्या धर्तीवर व्हावे जेणेकरुन आरोपी फिर्यादीचा वेळ व पैशाची बचत होऊन न्याय त्वरित मिळेल, अशी आशा डॉ. नंदकिशोर मैंदळकर यांनी व्यक्त केली.महिलांच्या हाती ४९८(अ) चा कायदा आहे. मर्जीप्रमाणे पती नाचला तर, ठिक नाहीतर ४९८ (अ) चा कायद्यानुसार सासरचे सर्वकुटुंब गजाआड करता येते. घरात पत्नी आहे की, दहशतवादी आहे. हेच कळत नसल्याच्या भावना काहींनी यावेळी व्यक्त केल्या. या कायद्याच्या गैरवापरामुळे संंपूर्ण कुटुंब दहशतीत वावरते, नातेवाईक व समाज विरोधात असते. महिला तक्रार मंचात खटला दाखल करताना पती दारु पितो, मारहाण करतो, शारीरिक व लैंगिक त्रास देतो, खर्चाला पैसे देत नाही, घरी उशीरा येतो, परस्त्रीशी संबंध आहे. अशी तक्रार करते. परंतु येथे समझौता न झाल्यास तीच स्त्री माहेरची मंडळी, संधिसाधू सामाजिक कार्यकर्त्यांना सोबत घेऊन पती मला हुंड्यासाठी त्रास देतो असे खोटे सांगतात. हुंडाबळीची केस करते. आणि पूर्ण परिवाराला हुंडाबळीच्या नरकयातना भोगाव्या लागतात. यात घरातील वृद्ध, महिला, लहान मुल, गर्भवती स्त्रीया अडकल्या जाते.पत्नी पतीला आपल्या मर्जीत ठेवतात. पतीचा एटीएमसारखा वापर करीत आहे. सासू व सासऱ्याला हमाल बनविले आहे. या प्रकरणात माहेरील लोकांचा हात असतो, ज्या घरात माहेरील लोकांची ढवळाढवळ जास्त असते ते घर उद्ध्वस्त होण्यास वेळ लागत नसल्याचाही सूर यावेळी काहींनी व्यक्त केला. मोबाईलची महत्त्वाची भूमिका असते. लग्नाला सौद्याचे रुप येत आहे. आज लग्न व चार दिवसांनी पैशाची मागणी करुन घटस्फोट, विवाह पैसा कमविण्याचे साधन होत आहे. समाजाला कीड पोखरुण काढीत आहे. भविष्यात कौटुंबिक समस्या वाढण्याची शक्यताही यावेळी काहींनी व्यक्त केली.पोलीस प्रशासनाने कौटुंबिक प्रकरणात आतताईपणा करुन कारवाई करु नये. सामाजिक जाण ठेवावी, आईवडिलांची आपले पणाची भावना वाढीस लागावी, कुटुंबाची संकल्पना टीकून राहावी, पाल्यांना संपूर्ण घराचा अनुभव जगता यावा, कौटुंबिक कलहाचे निकाल लवलकर लागावे या उद्देशाने कौटुंबिक न्यायालयाची गरज असल्याचे मत यावेळी अनेकांनी व्यक्त केले. सभेला संदीप आत्राम, शंकर लोनगाडगे, किशोर ताजणे, आशिक शेख व इतर संघटनेचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. (नगर प्रतिनिधी)
पत्नी पीडितांनी व्यक्त केल्या आपल्या व्यथा
By admin | Updated: August 5, 2014 23:43 IST