अथुरलिये रतन थेरोंना विश्वास : धम्मचक्र अनुप्रवर्तन सोहळ्याच्या मुख्य समारंभात मांडले विचारचंद्रपूर : आजचा आशिया खंड जंबोद्वीप म्हणून ओळखला जात होता. अडीच हजार वर्षांपूर्वी या भूमीत तथागत बुद्धांचा धम्म अस्तित्वात होता. चारही दिशा धम्म तत्वज्ञानाने प्रवाहित झाल्या होत्या. मैत्री व करुणा नांदत होती. मात्र परकीय आक्रमणांनी धम्माला ग्लानी आली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी धम्माला नवी ऊर्जा दिली. बुद्धांचे तत्वज्ञान शांतता व मैत्री भावना जोपासणारे असल्याने जगाला आगामी २० वर्षात ते मान्य करावे लागेल, असा दृढ विश्वास जागतिक किर्तीचे धम्म प्रचारक, श्रीलंका सरकारचे सल्लागार तथा खासदार भन्ते अथुरलिये रतन थेरो यांनी चंद्रपुरात शुक्रवारी व्यक्त केला.चंद्रपूरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरिअल सोसायटीच्या माध्यमातून ५९ व्या धम्मचक्र अनुप्रवर्तन सोहळा धम्मभूमीवर आयोजित करण्यात आला. शुक्रवारी मुख्य समारंभ पार पडला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून श्रीलकांचे खासदार भन्ते अथुरलिये रतन थेरो बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अरुण घोटेकर होते.याप्रसंगी विचार मंचावर भन्ते बोधीसारा थेरो (श्रीलंका), भन्ते विनय बोधीप्रिय थेरो, भन्ते बोधीरत्न, भन्ते सदानंद थेरो, भन्ते प्रज्जारत्न, धम्मचारी पद्मबोधी, चंद्रबोधी पाटील, डॉ. सिद्धार्थ डोंगरे, अशोक घोटेकर, प्राचार्य राजेश दहेगावकर आदींची उपस्थिती होती.अथुरलिये रतन थेरो यावेळी पुढे म्हणाले, ज्या प्रमाणे आई व मुलाचे नाते असते, त्याप्रमाणे धम्माची शिकवण आहे. इतराप्रति करुणा, मैत्री, जिव्हाळा बाळगा, माणसाचे कल्याण आपुलकीच्या भावनेतून साधण्याची गरज आहे. हीच भावना राष्ट्राप्रति असावी, मानवाप्रति असावी. एवढेच नाही तर पर्यावरणाविषयीही ही भावना बाळगण्याची प्रेरणा तथागत बुद्धांच्या तत्वज्ञानात सांगितली असल्याचे ते म्हणाले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्वत:चा विचार केला असता तर ते जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असते, असेही ते म्हणाले. त्यांनी पाली भाषेतील गाथा व भाषण सिंहली भाषेतून केले. त्यांच्या भाषणाचा मराठी अनुवाद भन्ते धम्मज्योती यांनी केला.सामाजिक, धार्मिक व राजकीय क्षेत्रात कार्य करणाऱ्यासाठी आपण प्रशिक्षण देत असून तथागताचा धम्म आरशासारखा असून प्रचलित व्यवस्थेने नाकारलेल्यांना समानता प्रदान करणारा आहे, असे ते म्हणाले.यावेळी सदानंद कोये म्हणाले की, जगातील १०० विद्वानापैकी पहिल्या क्रमांकावर तथागत सिद्धार्थ गौतम बुद्ध असून चवथ्यास्थानी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आहेत. जगाच्या पाठीवर भारतातील विद्वान असल्याने गौरव वाढला आहे. धम्म सागरात एकजीव होताना मतभेदाला थारा न देता संवादातून धम्म चळवळ गतीेमान करण्याची आज अतिशय गरज आहे, असे त्यांनी सांगितले.धम्मचारी पद्मबोधी, अशोक घोटेकर यांनी मनोगत व्यक्त केले. संचालन प्रा. मनोज सोनटक्के तर आभार शैलेंद्र शेंडे यांनी मानले. सद्धम्माची गौरव गाथा कार्यक्रमाच्या माध्यमातून गायक कलावंत हेमंत शेंंडे यांनी बुद्ध भीम गीतांचा कार्यक्रम सादर करुन वातावरणात मंगलमय साद घातली. (शहर प्रतिनिधी)
बुद्धांचे तत्त्वज्ञान जगाला मान्य करावे लागणार
By admin | Updated: October 18, 2015 01:07 IST