चंद्रपूर : बिल्ट ट्री युनियटच्या बल्लारपूर व आष्टी येथे कार्यरत कामगारांना बिल्ट प्रबंधनद्वारे किमान वेतन देण्यात येत नव्हते. या विरोधात कामगारांनी विदर्भ प्रहार कामगार संघटनेच्या नेतृत्वात सहायक कामगार आयुक्त तथा किमान वेतन अधिनियमाअंतर्गत न्याय देण्याची मागणी केली होती. प्राधिकरण अधिकारी प्र.ल. बाभुळकर यांनी कामगारांना मुळ वेतनाचे अंतर व नुकसान भरपाई मिळून ३ कोटी ६५ लाख ४७ हजार ९६५ रुपये देण्याचा आदेश दिल्याची माहिती अॅड. हर्षलकुमार चिपळुनकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.अवंथा ग्रुपमधील बिल्ट ट्री टेक आस्थापना बल्लारपूरमध्ये १२ व आष्टी येथे ८ वर्षांपासून कामगारांची फसवणूक करण्यात येत होती. कामगारांना किमान वेतनापेक्षाही कमी वेतन दिले जात होते. यासंदर्भात विदर्भ प्रहार कामगार संघटनेच्या माध्यमातून न्यायासाठी कामगार आयुक्तांकडे मागणी केल्याची त्यांनी सांगितले. दोन्ही पक्षांना ऐकून घेत न्यायालय प्राधिकाऱ्यांनी बिल्ट ट्री च्या कामगारांना किमान वेतनानुसार ८ पट व मुळ फरकाच्या रकमेसह नुकसान भरपाई रक्कम ३० दिवसात भरण्याचे आदेश दिले. सोबतच बिल्ट ट्री आस्थापनेला किमान वेतन अधिनियमाच्या १९५८ च्या भाग २ अंतर्गत शेतीअनुसूचित उद्योगाच्या ऐवजी वन व वनिकरण याअनुसूचित उद्योगाचे किमान वेतन दर लागू होतात ही बाब महाराष्ट्र शासनाच्या विधी व न्यायविभागाच्या पत्राद्वारे निश्चित करण्यात आली.पत्रकार परिषदेला वर्षा कोतपल्लीवार, दिवाकर लखमापुरे, विमला जोगेलवार, लीलावती पटले, पुष्पा ढोके, पूर्णिमा गुड़ेकर आदी उपस्थित होते. (नगर प्रतिनिधी)
कामगारांना मिळणार ३.६५ कोटी रुपये
By admin | Updated: June 10, 2014 23:57 IST