चंद्रपूर : राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानअंतर्गत कार्यरत कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांना वाढीव मानधन मिळाले नाही, असा आरोप करून आज जिल्हा व तालुकास्थळी एकदिवसीय कामबंद आंदोलन केले.
मागील १५ वर्षांपासून आरोग्य कर्मचारी कार्यरत आहेत. सेवेत कायम करावे, वेतन फरकाची रक्कम देण्यात यावी, या मागण्यांसाठी अनेकदा आंदोलन केले. ऑक्टोबर २०२० मध्ये शासनाने वाढीव मानधन देऊन एरिअस देण्याचे मान्य केले होते. काही जिल्ह्यात वाढीव मानधन दिले जात आहे. परंतु जिल्ह्यातील या कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांना लाभ मिळाला नाही. त्यामुळे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आज जिल्हा व तालुकास्थळी कामबंद आंदोलन केले. दरम्यान, तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधीक्षक व जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राठोड यांना मागण्यांचे निवेदन सादर केले. निवेदन देताना संघटनेचे राज्य समन्वयक राकेश नाकाडे, विकास वाढई, जयंजली मेश्राम, नामदेव येनूरकर, सपना मंडल, प्रवीणा गोंडाने, धनश्री जंगीतवार, धनवार, सुलभा हिंगणे्, संदीप मुन, नवले श्वेता, अलिवार बिटुलवार उपस्थित होते.