चंद्रपूर : शहराच्या सौंदर्यात भर पडावी, नागरिकांना प्रसन्न वाटावे तसेच शहरात सुटसुटीतपणा वाटावा यासाठी चंद्रपूर शहरातील विविध चौकांचे सौंदर्यीकरणे केले जात आहे. मात्र कामातील संथगतीमुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.
वरोरा नाका ते जनता काॅलेज चौकाकडे जाणाऱ्या हुतात्मा स्मारकाच्या एका कोपऱ्यावर सौंदर्यीकरणाचे काम सुरू आहे. मात्र मागील एक ते दीड वर्षापासून काम अर्धवट स्थितीत आहे. तर रामनगर चौकाकडील रस्त्यावर डाॅ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाच्या एका बाजूनेनेही सौंदर्यीकरण केले जात आहे. मात्र हे कामही धीमेच आहे. त्यातच संत कवरराव चौकातीलही सौंदर्यीकरणाचे काम ठप्प पडले आहे. त्यामुळे आता नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.
या चौकाचे सौंदर्यीकरण करण्याच्या नावावर तोडफोड करून देखावा करण्यात आला आहे. मात्र पुढे काय, असा प्रश्न आता सामान्य नागरिक उपस्थित करीत आहेत. महापालिका प्रशासनाने याकडे लक्ष देऊन सौंदर्यीकरणाचे काम त्वरित पूर्ण करावे, अशी मागणी केली जात आहे.