बल्लारपूर : भारतीय संविधानामुळे महिलांचे अधिकार सुरक्षित आहेत. फुले दाम्पत्यांनी १८४८ ला शाळा काढली. तेव्हा केवळ सहा विद्यार्थिनी होत्या. त्यांच्या शिक्षणाच्या कार्याची प्रभावी यंत्रणा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय संविधानात केल्याने आज पुरुषाच्या खांद्याला खांदा लावत महिला प्रगती करू शकल्या, असे विचार सेवानिवृत्त मुख्याध्यापिका संघा साव यांनी व्यक्त केले.
त्या राष्ट्रमाता सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ व महिला दिनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात बोलत होत्या. यावेळी कार्यक्रमाच्या मुख्य अतिथी प्रा.निशिगंधा दुधे यांना प्राचार्य पदवी मिळाल्याबद्दल त्यांचा संघा साव यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमात सुनंदा तुंबडे, आम्रपाली उपरे, सुलोचना मालखेडे यांनीही विचार मांडले. संचालन व प्रास्ताविक प्रा. मीना बारसागडे यांनी केले. यावेळी सिंधुताई उपरे, छबुताई, विमल कांबळे, माया करमनकर, रूपाली कांबळे, सुजाता उपरे, किरण खैरे, जया तामगाडगे, शीतल दबडे, उज्ज्वला दबडे, एम.टी.साव, जी.के. उपरे यांची उपस्थिती होती.