घुग्घुस : येथील अमराई १ व २ वॉर्डाला पाणीपुरवठा करणारी योजना गेल्या सात-आठ महिन्यांपासून बंद आहे. मात्र ही योजना पूर्ववत सुरू करण्याकरिता ग्रामपंचायतकडून उपाययोजना करण्यात आली नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या महिलांनी बुधवारी दुपारी भर ऊन्हात ग्रामपंचायत कार्यालयावर मोर्चा काढून संताप व्यक्त केला. दरम्यान, सरपंच कार्यालयात गैरहजर असल्याने ग्रामविकास अधिकारी विजय यारेवार यांना निवेदन देऊन तत्काळ पाणीपुरवठा योजना सुरू करण्याची मागणी केली आहे. घुग्घुस कॉलरी क्र.२, जोगी प्लॉट वरील अमराई, घुग्घुस वार्ड १ व २ ला पाणी पुरवठा योजनेच्या ट्युबवेलचे अनुभवी फिटरच्या गैरहजेरीत काम करण्यात आले. त्यामुळे पंप काढताना पंपसह १८ पाईप ट्युबवेल मध्ये पडले. सदर पाईप व मोटार पंप काढण्याचे व पाणीपुरवठा योजना पुर्ववत करण्याकडे ग्रामपंचायतीकडे सातत्याने मागणी व पाठपुरावा करण्यात आला. मात्र त्या ट्युबवेलच्या दुरूस्तीकडे ग्रामपंचायतकडून दुर्लक्ष झाल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. मार्च महिन्याच्या मासिक सभेत मोटारपंप खरेदीचा ठराव मंजूर झाला. मात्र अजूनही मोटारपंप खरेदी झाली नाही. पाणीपुरवठा योजना बंद झाल्यापासून गावातील मुख्य पाणी पुरवठा योजनेमार्फत पाणी पाच-सहा दिवसातून मिळत होता. मात्र वर्धा नदीच्या पात्रातील पाण्याची पातळी खालावल्याने मोटार पंप खाली उतरविण्याच्या कामाकडे लक्ष न दिल्याने मंगळपासून पाणीपुरवठा ठप्प झाला. परिणामी महिलांनी बुधवारी मोर्चा काढला. (वार्ताहर)
पाण्यासाठी घुग्घुस ग्रामपंचायतीवर महिलांचा मोर्चा
By admin | Updated: May 19, 2016 00:45 IST