चंद्रपूर : दिवसेंदिवस वाढणाऱ्या महागाईने जनसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. गृहिणींना घरगुती बजेट बसविण्यात मोठी कसरत करावी लागत आहे. त्यामुळे सरकारने वाढत्या महागाईला पायबंद घालावा, अशी मागणी वंचित बहुजन महिला आघाडीतर्फे जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनातून केली आहे. मागील काही महिन्यांपासून इंधनाचे, गॅस सिलिंडर, तेलाचे, डाळीचे यासोबतच जीवनावश्यक वस्तूच्या किमतीचे दर दिवसेंदिवस वाढत आहेत. ही दरवाढ देशातील जनतेला जीवघेणी ठरत आहे. कोरोनामुळे अनेकांचा रोजगार हिरावला आहे. परिणामी आर्थिक अडचणींना सामोर जावे लागत आहे. त्यातच दिवसेंदिवस होणारी वाढ सर्वसामान्यांचे कंबरडे मोडणारी आहे. त्यामुळे वाढती महागाई कमी करावी, अन्यथा राज्य व केंद्र सरकारच्या विरोधात रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा वंचित बहुजन आघाडीच्या शहराध्यक्ष तनुजा रायपुरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे. निवेदन देताना जिल्हा सल्लागार लता साव, अंकिता उके, इंदूताई डोंगरे, मोनाली पाटील, अश्विनी जीवणे, ममता रामटेके, सुनीता तावाडे, प्रेमिला बेंदले, पौर्णिमा जुनघरे, मीनाक्षी साव, रमाबाई मेश्राम, विद्या टेंभरे, नेहा मेश्राम, मंजूषा निरंजने, शीतल बोरीकर, सुविधा बांबोडे, सुलभा चांदेकर, शोभा वाघमारे, विमा पाटील आदी उपस्थित होते.
वाढत्या महागाईविरोधात महिला आक्रमक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2021 04:29 IST