व्यापाऱ्यांच्या संतापजनक प्रतिक्रिया : ‘त्या’ पोलिसांवर गुन्हे नोंदवा, निलंबन कराचंद्रपूर : गुन्हेगारांवर अंकुश ठेवून निरपराध आणि सामान्य जीवन जगणाऱ्या नागरिकांना सन्मानाची वागणूक देणे पोलिसांकडून अपेक्षीत आहे. मात्र, कसलिही चौकशी न करता निरपराध्याला थेट गुरासारखे बदडून काढणे ही पोलिसांची कसली मानसिकता, असा प्रश्न युवा व्यापाऱ्याला मारहाण केल्याच्या घटनेनंतर चंद्रपुरात उपस्थित होत आहे.रोहित बोथरा या व्यापारी युवकाला पोलिसांनी बेदम मारहाण केल्यापासून समाजमनात तिव्र असंतोष पसरला आहे. यासंदर्भात आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना चेम्बर आॅफ कॉमर्सचे अध्यक्ष हर्षवर्धन सिंघवी म्हणाले, एखाद्याला कुण्या गुन्ह्यात पोलिसांनी अटक केली तर त्याला खरच मारहाण केली जाते का, असा प्रश्न आहे. येथे तर एका निरपराध माणसाला अतिशय निर्दयपणे मारहाण करण्यात आली. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करून ज्या पोलिसांनी हा गुन्हा केला त्या पोलिसांवर त्यांनी केलेल्या गुन्ह्याचे स्वरूप पाहून कठोर कारवाई केली पाहिजे. या प्रकरणामुळे नागरिकांमध्ये असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे.चेंबर आॅफ कॉमर्सचे उपाध्यक्ष, सदानंद खत्री म्हणाले, जे प्रकरण घडले, ते केवळ आता एकट्या रोहीत बोथरा या व्यापारी युवकाचे राहील नसून शहरातील सर्व व्यापारी, सामान्य नागरिकांचे झाले आहे. पोलिसांचे काम सामान्यांचे रक्षण करणे आहे. त्यांच्यात असुरक्षिततेची भावना निर्माण होऊ नये, यासाठी पोलिसांनी काळजी घेतली पाहिजे. चंद्रपुरात मात्र उलटे घडले. ही बाब सामान्यांसाठी बरी नव्हे. अशा घटना वारंवार घडू नये, निरपराध माणसाला अशा पद्धतीने अमाणूषपणे मारहाण केली जाऊ नये, यासाठी जिल्हा पोलीस अधिक्षकांनी या प्रकरणात जे दोषी असतील, त्यांच्यावर कठोर कारवाई करावी.उपाध्यक्ष रामकिशोर सारडा म्हणाले, पोलिसांच्या हातून अतिशय चुकीचे काम घडले आहे. शहरात दारूबंदीच्या नावावर काय सुरू आहे, ते साऱ्यांनाच ठाऊक आहे. त्यामुळे एखाद्या निरपराधाला पकडून तू दारू तस्करी करतो आहे, असा ठपका ठेऊन त्याला मारहाण करणे, ही बाब निश्चितच कायद्यात बसणारी नाही. त्यामुळे या प्रकरणात समाधानकारक कारवाई अपेक्षित आहे.उपाध्यक्ष विनोद बजाज म्हणाले, एखाद्याला संशयित म्हणून पकडल्यानंतर खरे तर त्याला विचारपूस करणे गरजेचे होते. मात्र संबंधिताला त्याची बाजू मांडू देण्याची कोणतीही संधी न देता त्याला एखाद्या गुन्हेगारासाठी मारहाण करणे, हे कितपत संयुक्तिक आहे. या प्रकरणाचा प्रामाणिकपणे तपास करून कठोर कारवाई व्हायला हवी.व्यापारी मंडळाचे अध्यक्ष संतोष चिल्लरवार म्हणाले, एखाद्या असहाय्य सामान्य माणसाला पोलिसांनी किती मारावे, याची काही मर्यादा असावी की नाही. पोलिसांनी जे केले ते अतिशय चुकीचे आणि सामान्यांना संताप आणणारे आहे. विविध संघटनांचा निषेध मोर्चाकोणताही अपराध नसताना रोहीतला पोलिसांकडून मारहाण करण्यात आली. या घटनेचा निषेध करण्यासाठी बुधवारी विविध संघटनांच्या सहभागात मोर्चा काढण्यात आला. मोर्चात माहेश्वरी समाज, अग्रवाल समाज, गुजराती समाज, चंद्रपूर सर्कल बिल्डर, पूज्य सिंघी पंचायत, फुटवेअर असोसिएशन, वर्धमान स्थानक समाज, झेरॉक्स संघटना, आर्य वैश्य संघटना, ट्रान्सपोर्ट असोसिएशन, चंद्रपूर कपडा असोसिएशन, रेडिमेड होजिअरी, पंजाबी सेवा समिती, माहेश्वरी सेवा समिती, प्लायवूड असोसिएशन, कोल असोसिएशन, चंद्रपूर बचाव सेवा समिती आदी संघटनांचे पदाधिकारी सहभागी झाले होते. मोर्चा जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयावर पोहचल्यानंतर तेथे जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप दिवाण यांना निवेदन सादर केले. यावेळी चंद्रपूर चेंबर आॅफ कॉमर्सचे अध्यक्ष हर्षवर्धन सिंघवी, सदानंद खत्री, रामजीवन परमार, दामोदर मंत्री, रामकिशोर सारडा, हरिष गिडवाणी, घनश्याम दरबार, कुक्कू साहनी, रमेश बोथरा, विनोद बजाज, रामू तिवारी, मुन्ना भंडारी, सत्यम सोनी, चंद्रपूर व्यापारी मंडळाचे अध्यक्ष संतोष चिल्लरवार, जितू चोरडीया, नरपत भंडारी, गोविंद सारडा, मुन्ना चांडक, जितेंद्र जोगड, श्रीचंद हसानी, राजेश पटेल, शिवन हासानी, प्रशांत बैद, दिनेश बजाज, अमर गांधी, महेंद्र मडलेचा, राजेंद्र लोढा, पिंटू मंत्री, देवेंद्र मांडवीया, राजेश डागा, सुनिल कारिया, संदीप माहेश्वरी, अमित नथवानी, नितीन पुगलिया, विवेक जैन यांच्यासह शेकडो व्यापारी सहभागी झाले होते.
निरपराध्याला मारहाण करणारी ही कसली मानसिकता?
By admin | Updated: September 4, 2015 00:56 IST