संबंधित विभागाने लक्ष द्यावे : शेतसिंचनाकरिताच वापरले पाणीनवरगाव : सिंदेवाही तालुक्यातील रत्नापूरला उमा नदीवरून नळयोजनेद्वारे पाणी पुरवठा केला जातो. त्यालाच लागून पाणी साठविण्यासाठी बंधारा बांधण्यात आला आहे. मात्र मार्च महिन्यातच ही नदी कोरडी पडल्याने रत्नापुरात आता पिण्याच्या पाण्याचा प्रश्न पेटणार आहे.मागील पंचेवीस वर्षापूर्वी रत्नापूर-नवरगावला पाणी पुरवठा करण्यासाठी संयुक्त नळयोजना मंजूर झाली. शिवणी जवळील उमा नदीमध्ये दोन विहिरी खोदण्यात आल्या. तसेच नदीच्या काठावर एक विहीर आणि त्यावर मोटरपंप बसविण्यात आले. याच मोटरपंपाच्या साहाय्याने रत्नापूर-नवरगावला नळयोजनेच्या माध्यमातून पाणी पुरवठा केला जात होता.मात्र दरवर्षी उन्हाळ्यामध्ये नदी कोरडी होत असल्याने पाण्याचा प्रश्न निर्माण व्हायचा. जेव्हा गावाला पाण्याची गरज असायची, तेव्हाच पिण्याचे पाणी मिळत नव्हते. त्यामुळे नदीमधील विहिरींना उन्हाळ्याच्या दिवसांमध्येसुद्धा पाणी मिळावे आणि रत्नापूर-नवरगाव नळयोजनेला सतत पाणी पुरवठा सुरळीत सुरू राहावा, यासाठी नदीमध्ये ६७ लाख रुपये खर्च करून चार-पाच वर्षापूर्वी मोठा बंधारा बांधण्यात आला. जेणेकरून नदीचे पाणी वाहून जाणार नाही. हे पाणी जमिनीतच जिरले पाहिजे व नळयोजना सतत सुरू राहिली पाहिजे, हा उद्देश होता.यावर्षीसुद्धा जानेवारी महिन्यातच बंधारा अडविण्यात आला आणि बंधाऱ्यामध्ये सहा-सात फुट पाणी नदी परिसरात सात कि.मी. च्या आसपास जमासुद्धा झाले. गावकऱ्यांना वाटायला लागले की यावर्षी उन्हाळभर आपल्याला नळयोजनेद्वारे पाणी मिळणार. मात्र आजच्या परिस्थितीत ते स्वप्नवत ठरले आहे.नदीमध्ये ज्या भागात विहिरी आहेत, त्या नदीच्या दोन्ही भागांना शेतकऱ्यांनी धानाच्या पिकाची डबल फसल लावलेली असून काही शेतकऱ्यांनी भाजीपाला लावलेला आहे. शेतकरी मोटारपंप व बोअरवेलच्या साहाय्याने बंधारा परिसरातील पाणी रोजच शेतीतील पिकांसाठी ओढत असतात. त्यामुळे बंधारा पुर्णत: कोरडा पडलेला असुन पाण्याचे स्त्रोत आटलेले आहेत. या परिसरात तीस-चाळीस मोटारपंप व बोअरवेलही आहे. त्यांना केवळ पावसाळी पीक घेण्यासाठी तीन महिन्यासाठी पाणी घेण्याची परवानगी असताना ते बारमाही पिकांसाठी नदीतील पाण्याचा दुरूपयोग करीत आहेत. ही परिस्थिती मागील कित्येक वर्षांपासून सुरू असून ग्रामपंचायत प्रशासनाकडून दरवर्षी वरिष्ठ स्तरावर विद्युत कनेक्शन कापण्यासाठी कळविले जाते. मात्र वरिष्ठ अधिकारी याकडे दुर्लक्ष करीत असल्याने शेतकऱ्यांचे फावत आहे. आणि ते दरवर्षी डब्बल पिक घेत आहेत. मात्र या शेतकऱ्यांमुळे रत्नापूर गावातील महिलांना उन्हाळ्यामध्ये पिण्याच्या पाण्यासाठी भटकंतीची वेळ येत आहे.शिवाय नदीतील विहिरीच्या वरच्या भागाला शिवणीला जाण्यासाठी उमा नदीवर पुलाचे बांधकाम करण्यात आले. बांधकाम हे १५-२० फूट खोलातून केले असल्याने पलिकडील पाणी खालच्या भागाला अजिबात झिरपत नाही. त्यामुळेही रत्नापूरवासीयांना नळयोजना उन्हाळ्यासाठी कुचकामी ठरत आहे.नवरगाववासीयांना पाणी पुरवठा करण्यासाठी धुमनवेडा येथील बोअरवेल असून रत्नापूरवासीयांना उन्हाळ्यासाठी या एकमेव नळयोजनेवरच अवलंबून राहावे लागत आहे. कारण इतर पाण्याचे कुठलेही स्त्रोत नाहीत. पाण्याची या गंभीर समस्येची दखल ग्रामपंचायत रत्नापूरने घेतली असून रत्नापूर नळयोजनेला मिळणारे पाणी शेतकऱ्यांनी ओढल्यामुळे बंधारा शोभेची वस्तु बनला आहे. तेव्हा नदीपरिसरातील शेतकऱ्यांचे विद्युत कनेक्शन तात्काळ कापावे, यासाठी रत्नापूर ग्रामपंचायतीने सरपंच सदाशिवराव मेश्राम, ग्रामविकास अधिकारी बोपनवार यांनी जिल्हाधिकारी चंद्रपूर, उपविभागीय अधिकारी चिमूर यांनी निवेदन दिले आहे. (वार्ताहर)
मार्चमध्येच उमा नदी कोरडी रत्नापुरात पाणी टंचाई
By admin | Updated: March 23, 2017 00:35 IST