सिंदेवाही : शहरात दरवर्षी उन्हाळ्यात पाणी टंचाई असते. यावेळीसुद्धा नगर पंचायत उत्तम नियोजन करून एक दिवसात आड पाणी पुरवठा करीत आहे. पण शहरात मागील काही दिवसांपासून काही नागरिक टिल्लू पंपचा वापर करीत असल्याने इतर नागरिकांसाठी कृत्रिम पाणी टंचाई निर्माण झाली आहे.
असे असतानाही याकडे नगरपंचायत दुर्लक्ष करीत आहे. प्रभाग क्रमांक १३ आणि १४ मधील नागरिक नगरपंचायतला तक्रार करूनसुद्धा नगरपंचायत याकडे लक्ष द्यायला तयार नाही. शहरात जवळपास सतराशे नळधारक आहेत. पण मुबलक पाणी मिळत नसल्याने नागरिक हैराण आहेत. उन्हाळ्यात पाण्याची भीषण टंचाई असल्याने पाण्याचे योग्य नियोजन करून नगरपंचायत अधिकाऱ्यांनी सर्वांना न्याय द्यावा, अशी नळधारकांची मागणी आहे. शहरासाठी तीन पाण्याच्या टाक्या आहेत. या पाण्याच्या टाक्या बरोबर भरल्या जात नाही, अशी बोंब आहे. शहराला सरटपार नदीचे पाणी पुरवले जाते. शहरातील टिल्लू पंपाच्या संबंधात सगळ्यांनी मिळून कारवाई केली तर सर्वांना योग्य पाणी मिळेल, अशी नागरिकांची मागणी आहे.