चंद्रपूर शहरालगत नवीन चंद्रपूर ही वस्ती वसली आहे. येथील गाळेधारकांना नियमित पाणीपुरवठा करण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणतर्फे पाणीपुरवठा योजना राबविली जात आहे. पूर्ण ठेव तत्त्वावरील या योजनेचे काम अंतिम टप्यात आहे. सध्या या योजनेतंर्गत सुमारे एक हजारांवर कुटुंबांना पाणीपुरवठा केला जात आहे. धानोरा गावाजवळील वर्धा नदीतील पाण्याची उचल करून या कुटुंबांना पाणीपुरवठा सुरू आहे. परंतु, सध्या वर्धा नदीतील पाण्याची पातळी खालावली आहे. त्यामुळे म्हाडा वसाहतीतील पाण्याचा पुरवठा बंद झाला आहे. पाणीपुरवठ्याचा दुसरा कोणताही पर्याय नाही. त्यामुळे नागरिक पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करीत आहेत. त्यामुळे वरोरा येथील वर्धा पॉवर प्लांटच्या मार्डा धरणातून धानोरा गावाजवळील स्रोताच्या ठिकाणी ०.०२ दलघमी पाणी प्रतिमाह टप्याटप्याने आवश्यकतेनुसार सोडण्याची मागणी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे यांनी केली. याबाबत पालकमंत्री वडेट्टीवार यांनी कार्यकारी अभियंत्याला आदेश दिले आहेत.
मार्डा धरणातील पाण्याने म्हाडावासीयांची तहान भागणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2021 04:28 IST