कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी मागील वर्षी मार्च महिन्यामध्ये लाॅकडाऊन करण्यात आले. त्यामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले. अनेकांचा रोजगार गेला तर आजपर्यंत ४१३ रुग्णांना आपला जीव गमवावा लागला. दरम्यान, पुन्हा कोरोनाने तोंड वर काढले आहे. रविवारी एका दिवशी २१५ रुग्ण तर शनिवारी १२३ रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे आजपर्यंत कोरोना रुग्णसंख्या २५ हजार ७३३ वर जाऊन पाेहोचली असून, सद्यस्थितीत १३०५ रुग्णांवर विविध ठिकाणी उपचार सुरू आहेत. सातत्याने वाढणारी रुग्णसंख्या कमी व्हावी, नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी, मास्क, सॅनिटायझर, सोशल डिस्टन्स, तसेच कामाशिवाय नागरिकांनी बाहेर पडू नये, यासाठी जनजागृती करण्यासाठी प्रशासनाने पूर्णपणे कंबर कसली असून, आता शासकीय कार्यालयातील भिंतींवर जनजागृती मॅसेज लिहिणे सुरू केले आहे. विशेष म्हणजे, जिल्हा सामान्य रुग्णालय, ज्युबिली हायस्कूल, आझाद बाग, प्रशासकीय भवन परिसर, न्यायालय परिसर, जिल्हाधिकारी कार्यालय आदी सार्वजनिक ठिकाणी भिंतींवर आपत्ती व्यवस्थापन मदत व पुनर्वसन विभागाच्यावतीने कोरोना जनजागृतीचे चित्र काढले जात आहे.
जनजागृतीने रंगल्या शहरातील सार्वजनिक इमारतींच्या भिंती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 04:30 IST