सावरगाव : नागभीड तालुक्यातील उश्राळ मेंढा येथील श्री गुरुदेव सेवा मंडळाच्या वतीने गावातील युवक व बालगोपालांनी हातामध्ये खराटा, टोपल्या फावडे घेऊन ग्रामस्वच्छता, ग्रामशुद्धी व ग्रामनिर्माण मोहीम राबविली.
ग्रामसफाई दर गुरुवारी व्हावी, या दृष्टीने याची आखणी करावी. या कार्यात सर्व महिला पुरुष तसेच ग्रामपंचायतीच्या पदाधिकारी मंडळींनी स्वयंपूर्ण सहभागी व्हावे. प्रत्येकाने आपल्या कार्यात अंतर पडू देऊ नये. स्वच्छ आदर्श गाव राष्ट्राचा पाया आहे. हे घडवून आणण्यासाठी बुद्धिवादी लोकांनी खेड्याकडे लक्ष दिले पाहिजे. अलीकडे खेड्यात शिकून मोठे झालेले लोक - नोकरीच्या निमित्ताने शहरात स्थायिक होतात. पुढे त्यांचा गावांशी असलेला संपर्क तुटतो. हा तुटलेला संपर्क परत जोडून त्यांचा सहयोग घेत ग्रामशुद्धीचे काम निरंतर सुरू ठेवले पाहिजे. या कार्यास गती यावी. त्यासाठी वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी ग्रामगीतेत रामधूनची परंपरासुद्धा सुचविली आहे, अशी माहिती राष्ट्रसंत सेवक मधुकर टिकले या युवकाने दिली. या सामाजिक कार्यात मंगेश बोरकर, नितेश बोरकर, जतीन लोंढे आदींसह मुला-मुलींनी सहभाग नोंदविला होता.