वाहतूकदार त्रस्त ; रस्त्यावर पडले जीवघेणे खड्डे
कोरपना : जिवती तालुक्याला जोडणाऱ्या वनसडी ते पकडीगुड्डम रस्त्याची दैनावस्था झाली आहे. त्याची त्वरित दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आबिद अली यांनी केली आहे.
चार दशकांपूर्वी पाटबंधारे विभागाने या रस्त्यांची निर्मिती केली होती. त्यानंतर या रस्त्याची कधी जिल्हा परिषद बांधकाम विभाग तर कधी सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी अर्धवट दुरुस्तीचे कामे केली. त्यामुळे हा रस्ता आजतागयत पूर्णपणे सुसज्ज बनू शकला नाही. सदर मार्ग हा जिवती तालुका, पकडीगुड्म धरण, धनकदेवी येथील धानाई मंदिर, मराई पाटण आदी स्थळांना जोडणारा आहे. यामुळे येथील रेलचेल मोठ्या प्रमाणात आहे. सद्यस्थितीतील मार्ग अत्यंत खडतर झाल्याने वाहनधारकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.
या अनुषंगाने या रस्त्याचे संपूर्णता डांबरीकरण करून दुरुस्ती करण्यात यावी अशी अपेक्षा व्यक्त आहे.