रबीचे अतोनात नुकसान : विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊसचंद्रपूर : यावर्षी खरीप हंगामात पावसाने दगा दिला. सरासरीच्या तुलनेत अत्यंत कमी पाऊस झाल्याने खरीप पिके शेतकरी वाचवू शकला नाही. उत्पादनात घट येऊन शेतकरी आर्थिक कोंडीत सापडला. रबी हंगामात काही नुकसान भरून निघेल, अशी आशा असतानाही आता ऐन पिक हाती येण्याच्या वेळेवर अवकाळी पावसाने जबर फटका दिला आहे. याच आठवड्याच्या प्रारंभी तीन दिवस अवकाळी पाऊस बरसला. आता पुन्हा शुक्रवारी जिल्ह्यात सर्वत्र वादळी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे रबीचे मोठे नुकसान झाले आहे. यावर्षी शेतकऱ्यांवर वरूणराजाची अवकृपा सातत्याने कायम राहिली आहे. खरीप हंगामात मोठ्या आशेने शेतकऱ्यांनी पिकांची पेरणी केली. प्रारंभी पाऊस वेळेवर येईल, असा अंदाज हवामान खात्यानेही वर्तविल्याने भरघोस पिक येऊन आर्थिक बाजू सुधारेल, असे शेतकऱ्यांना वाटत होते. मात्र त्यानंतर पावसाने दगा दिला. अधेमधे पावसाने हजेरी लावली. मात्र सरासरीच्या तुलनेत अत्यंत कमी पाऊस झाला. ज्यावेळी शेतकऱ्यांना पावसाची गरज होती. नेमके त्याच वेळी पाऊस बरसला नाही. नदी-नाल्यातही अत्यल्प जलसाठा असल्याने सिंचनाचा मोठा प्रश्न निर्माण झाला होता. अशाही परिस्थिती शेतकऱ्यांनी पीक वाचविण्याचा कसाबसा प्रयत्न केला. मात्र उत्पादनात प्रचंड घट आली. लागवड खर्चही निघू शकला नाही. पाऊस नसल्याने बऱ्याच शेतकऱ्यांनी रबी हंगामाकडे पाठ फिरवली. मात्र काही शेतकऱ्यांनी रबीत तरी थोडेफार नुकसान भरून निघेल, या आशेपोटी गहू, हरभरा, लाखोरी, तूर उडीद, मुंग या रबी पिकांची पेरणी केली. आतापर्यंत सर्व ठिकठाक होते. मात्र फेब्रुवारी महिन्याअखेर अवकाळी पावसाने कहर केला.२८, २९ फेब्रुवारी व १ मार्च या सतत तीन दिवस जिल्ह्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने वादळी वाऱ्यासह हजेरी लावली. घुग्घुस येथे २८ फेब्रुवारीला रात्री गारपीट झाली. तर २९ फेब्रुवारीला ब्रह्मपुरी, जिवती, सिंदेवाही, चिमूर, मूल, सावली, गोंडपिंपरी आदी तालुक्यात जोरदार पाऊस झाला. त्यामुळे गहू, हरभरा, लाखोरी, तूर उडीद, मुंग या रबी पिकांसह भाजीपाला पिकाला मोठा फटका बसला आहे. २७ फेब्रुवारीलाही चंद्रपूरसह जिल्ह्यात काही ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. चंद्रपुरात सुमारे अर्धा तास पाऊस झाला होता. चिमूर, बल्लारपूर, सावली, नागभीड या तालुक्यातही या दिवशी रिमझीम पाऊस झाला. २९ फेब्रुवारीला सिंदेवाही, सावली तालुक्यातील गेवरा, जिवती तालुक्यातील पाटण, गडचांदूर, घुग्घुस व ब्रह्मपुरी येथे मुसळधार पाऊस झाला. तर सायंकाळच्या सुमारास ब्रह्मपुरीत पुन्हा पाऊस झाला. सिंदेवाही येथेही सुमारे एक तास झालेल्या वादळी पावसाने जनजीवन पुर्णत: विस्कळीत झाले होते. सध्या अनेक शेतकऱ्यांचे रबी पीक हाती येण्याच्या स्थितीत असून लाखोरी, तूर, हरभरा, गहू आदी रबी पिके कापणी करून शेतात ढीग करून आहेत. अशातच आज शुक्रवारी पुन्हा जिल्ह्यात अवकाळी पावसाने थैमान घातले. आज दुपारी ४ वाजताच्या सुमारास अचानक ढगाळ वातावरण तयार झाले. त्यानंतर विजांचा कडकडाटासह वादळी पावसाला सुरूवात झाली. जिल्ह्यातील चिमूर, राजुरा, जिवती, मूल, सावली, चंद्रपूर, कोरपना, बल्लारपूर, नागभीड तालुक्यात वादळासह पाऊस बरसला. (शहर प्रतिनिधी)शेतकऱ्यांची धावपळअनेक शेतकऱ्यांची कडधान्य कापून शेतात सुकण्यासाठी ठेवले आहेत. अशातच आज अचानक पावसाला सुरुवात झाल्यामुळे शेतकऱ्यांची मोठी धावपळ उडाली. अनेक शेतकरी कापलेला गहू व इतर पीक वाचविण्यासाठी विजांच्या कडकडाटातच शेतात धावपळ करताना दिसून आल्याचे आमच्या वार्ताहरांनी सांगितले.विजांच्या कडकडाटामुळे शेतकरी भयभीतशेतात काम करीत असताना अनेकांचा वीज पडून मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. आज राजुरा, मूल, चंद्रपूर आदी तालुक्यात असाच विजांचा कडकडाट सुरू होता. त्यामुळे शेतात जाऊन पीक कसे वाचवावे, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला होता. दरम्यान, राजुरा तालुक्यातील मंगी (बू.) येथील मलकू सोमा आडे (६०) यांचा आज शेतात काम करीत असताना वीज पडून मृत्यू झाला. मूल तालुक्यात गारपीटमूल तालुक्यातील अनेक भागात आज दुपारपासूनच पावसाने हजेरी लावली. तालुक्यातील अनेक भागात गारपीट झाल्याने नागरिकांसह शेतकऱ्यांची व लहानसहान दुकानदारांची चांगलीच धावपळ झाली.
जिल्ह्यात अवकाळी पावसाचे थैमान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2016 00:48 IST