सावरगाव : शासनाने सुरू केलेल्या "हर घर नल,नल से जल" या योजने अंतर्गत चंद्रपूर जिल्ह्यातील ग्रामपंचायती अंतर्गत नळ जोडणीचे काम थांबवावे. अशी मागणी चंद्रपूर जिल्हा सरपंच सेवा महासंघाचे जिल्हाध्यक्ष हेमराज लांजेवार यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदनातून केली आहे.
सध्यस्थितीत शासनाने प्रत्येक कुटुंबाला नळ मिळावे याकरिता 'हर घर नल,नल से जल' ही योजना अमलात आणली असून प्रत्येक गावातील प्रत्येक कुटुंबाला नळ जोडणीचे काम सुरू करण्यात आले आहे. त्यानुसार प्रत्येक कुटुंबाला नळ देण्यात येत आहे. मात्र सद्यस्थितीत उन्हाळ्याला सुरुवात झाली असल्याने पाणीपुरवठा योजनेच्या विहिरीचा पाणीसाठा कमी झालेला आहे. आणि उपलब्धच नळांनाच मुबलक पाणीपुरवठा होत नसल्याचे चित्र आहे. त्यातच शासनाच्या 'हर घर नल,नल से जल' या योजनेअंतर्गत नळजोडणीचे काम केल्याने पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण होणार आहे. शासनाने सर्वप्रथम पाण्याचे स्रोत बळकट करून मुबलक पाण्याची सोय करावी. त्यानंतरच वाढीव नळजोडणी करावी. अशी मागणी चंद्रपूर जिल्हा सरपंच सेवा महासंघाचे जिल्हाध्यक्ष हेमराज लांजेवार यांनी केली असून याबाबत जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांना शिष्टमंडळासह निवेदन दिले आहे. यावेळी सरपंच अमोल बावनकर, दिलीप गायकवाड यांच्यासह जिल्ह्यातील बहुसंख्य सरपंच उपस्थित होते.