असंतोष : बहिष्काराचा पवित्रा, तहसीलदारांना निवेदन आयुधनिर्माणी (भद्रावती) : अशैक्षणिक कामांचा बोजा पुन्हा शिक्षकांवर सोपविण्यात आला आहे. त्यामुळे शिक्षकांत असंतोष पसरला असून अशैक्षणिक कामे काढण्याची मागणी शिक्षक संघटनेने केली आहे.न्यायाची पाड अन्यायाची चीड या तत्त्वानुसार काम करणारी महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक समिती तालुका शाखा भद्रावतीने राष्ट्रीय लोकसंख्या नोंदवही अद्ययावत करण्यासाठी प्राथमिक शिक्षकांना प्रगणक म्हणून दिलेल्या सर्व नियुक्त्या रद्द करण्यात यावेत या आशयाचे निवेदन तहसीलदार भद्रावती यांना दिले आहे.मुख्यमंत्री आणि शिक्षणमंत्री यांनी महाराष्ट्रात प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र हा अभिनव उपक्रम सन २०१५ ते २०१७ या कालावधीत सक्रियपणे राबविण्याचे आदेश जारी केले आहेत. त्यानुसार जिल्हा परिषद अंतर्गत जिल्हास्तरीय सर्व जिल्हा परिषद शाळेत सदर उपक्रमाची कार्यवाही सक्रियपणे सुरु आहे. तसेच शाळांचा दर्जा व विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढविण्याच्या दृष्टीने जिल्हा परिषद चंद्रपूर यांनी नवचेतना मिशन प्रकल्प जिल्ह्यात राबविला जात आहे. दिवाळी पूर्वी प्रथम सत्र परिक्षा घेणे, माहिती सरल प्रक्रियेत समाविष्ट करणे आहे या शिवाय शालेय पोषण आहार योजना, बांधकाम शाळेची संपूर्ण माहिती सरल प्रक्रियेद्वारे आॅनलाईन भरणे. इत्यादी कामे मुख्याध्यापकासह शिक्षकांना करावी लागत आहे. बालकाचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा हक्क अधिनियम २००१ (आरटीई) नुसार शिक्षकांना दशवार्षिक जनगणना आणि वेळोवेळी येणाऱ्या निवडणुका या व्यतिरिक्त अन्य कोणतेही अशैक्षणिक कामांसाठी शिक्षकांना नेमता येणार नाही, अशा सूचना असतानाही महसूल विभागाने शिक्षकांवर राष्ट्रीय लोकसंख्या नोंदवही अद्यावत करण्याची काम लादले आहे. या कामांतर्गत राष्ट्रीय लोकसंख्या रजिस्टर तयार करणे शिक्षकांना घरोघरी जाऊन अर्ज भरायचे आहे. त्यात संपूर्ण कुटुंबाची माहिती भरायची असून त्याला आधार कार्ड क्रमांकाची जोडणी करायची आहे. या कामासाठी तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांना प्रगणक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर प्रशिक्षणही घेण्यात आले आहे. सदर कामाचे स्वरूप पाहता शैक्षणिक कामांवर परिणाम होण्याची शक्यता असून ही कामे वगळण्याची मागणी आहे. (वार्ताहर)
शिक्षकांवर पुन्हा अशैक्षणिक कामे
By admin | Updated: October 10, 2015 00:15 IST