निवेदन सादर : राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसची मागणीचंद्रपूर : चंद्रपूर येथे महाऔष्णिक विद्युत केंद्राची निर्मिती होण्याच्या अनुषंगाने या मार्गावरील दुर्गापूर येथील ९६.५७, ऊर्जानगर १५.७२ कोंडी (माल) २००.५८, कोंडी चक १८१.९९, नेरी १०५.४२ तसेच रानवेंडली येथील २००.२५ हेक्टर जमीन प्रकल्पाकरिता घेण्यात आली होती. तसेच राज्य महामार्ग २६१ ला शेवटची सीमा ग्राह्य धारुन सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून संरक्षक भिंत बांधण्यात आली होती. परंतु आज या सर्व प्रक्रियेला ३० वर्षाहून अधिकचा काळ लोटला आहे. मधल्या काळात शासनाने अनेक कायदे व धोरणात बदल केले आहे. येथील वीज केंद्राची अनाधिकृत संरक्षक भिंत ताबडतोब पाडण्यात यावी, अशा मागणीचे निवेदन राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नितीन भटारकर यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंताना दिले.महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम मंत्रालयामार्फत मुंबई महामार्ग अधिनियम १९५५, महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६९ प्रमाणे नियंत्रण रेषेसंदर्भात ९ मार्च २००१ ला एक धोरण आखण्यात आले. राज्य महामार्ग व प्रमुख राज्य महामार्ग यांच्या धोरणाप्रमाणे नागरी व औद्योगिक परिसर असल्यास रस्त्याच्या मध्यभागापासून २० मीटर तसेच अनागरी भाग असल्यास रस्त्याच्या मध्यभागापासून किमान ४० मीटर अंतरापर्यंत कोणतेही बांधकाम करता येत नाही. परंतु चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्रामार्फत बांधण्यात आलेली संरक्षक भिंत ही राज्य महामार्ग क्रं. २६१ या रस्त्याच्या मध्यभागातून सरासरी १० मीटर अंतरावर रस्त्यावर येत असून अनाधिकृत असल्याचे निष्पन्न झाले आहे. ऊर्जानगर ग्रामपंचायतीनेसुद्धा अनाधिकृत संरक्षक भिंत पाडण्याचा सर्वानुमते ठराव घेतला. चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्राने शासनाच्या धोरणानुसार नव्याने सरक्षक भिंतीचे बांधकाम केल्यास या परिसरात बाजारपेठेकरिता मुख्य मार्गावर मोठ्याप्रमाणात जागा उपलब्ध होईल व त्यामुळे गावातील अनेक सुशिक्षित बेरोजगार तरुण तसेच गरीब कुटुंबांना उदररनिर्वाह करण्याच्या अनुषंगाने किरकोळ व्यवसाय करता येणार आहे. म्हणून सामान्य व गरीब नागरिकांच्या अनधिकृत बांधकामावर करण्यात येणाऱ्या कारवाई प्रमाणेच चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्राच्या या अनधिकृत संरक्षक भिंत तातडीने पाडण्याची कारवाई करावी, अशा मागणीचे निवेदन सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष नितीन भटारकर, रायुकॉं शहर जिल्हाध्यक्ष गजानन पाल, जिल्हा उपाध्यक्ष अमोल ठाकरे, प्रदीप रत्नपारखी, राविकॉं शहर जिल्हाध्यक्ष सुजीत उपरे, संजय ठाकूर, नितीन रत्नपारखी, पवन मेश्राम, शैलेंद्र बेलसरे, नितीन घुबडे, रोशन शेख, आदींनी केली. (प्रतिनिधी)
वीज केंद्रातील अनधिकृत संरक्षक भिंत पाडा
By admin | Updated: December 16, 2014 22:51 IST