साईनाथ कुचनकार
चंद्रपूर : कुपोषणमुक्तीसाठी जिल्हा परिषद महिला बाल कल्याण विभागाने प्रयत्न सुरू केले आहेत.
दरम्यान, कोरोना काळात २०२०-२१ मध्ये २४६ ग्रामबाल विकास केंद्र स्थापन करून १७३ बालकांना कुपोषणमुक्त करण्यात विभागाला यश आले आहे. तर ८४ अतितीव्र कुपोषित बालकांवर सध्या उपचार सुरू आहेत. कोरोना काळात अंगणवाडी सेविका, आरोग्य सेविकांनी केलेल्या कामांमुळेच या बालकांना आधार मिळाला आहे.
गृहभेट तसेच अंगणवाडी स्तरावरून कुपोषित बालकांची आरोग्य तपासणी केली जात आहे. त्यानंतर आयटीसीकडे पाठविण्यात येते. बालकांच्या वजनानुसार किती आहार द्यायचा, हे निश्चित केले जाते. तज्ज्ञांच्या मार्गदर्शनातून उपचार देऊन त्यांना कुपोषणातून मुक्त करण्याचा प्रयत्न केला जात आहे. कमी वजनाची, वाढ खुंटलेली कुपोषित बालके सुदृढ व्हावी, यासाठी राष्ट्रीय बाल स्वास्थ अभियानांतर्गत हा कार्यक्रम राबविला जातो.
कोरोना काळामध्ये यंत्रणा ठप्प झाली होती. प्रशासनाकडून राबविण्यात येणारे विविध उपक्रम योजना काही काळ बंद केल्या होत्या; मात्र या काळातही विभागाने कुपोषणावर लक्ष केंद्रित करून कुपोषणमुक्तीसाठी प्रयत्न सुरूच ठेवले. कोरोना काळात राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांतून कुपोषित बालकांना आधार मिळाला. दरम्यान, या बालकांना कुपोषणातून मुक्त करण्यासाठी आरोग्य सेविका, अंगणवाडी सेविकांनी विशेष लक्ष दिले. एवढेच नाही तर २४६ अतिकुपोषित बालकांना ८४ दिवसांकरिता घरपोच इडीएनएफ आहाराचा पुरवठाही करण्यात आला.
बाॅक्स
कोणत्या वर्षात किती कुपोषितांवर उपचार
२०१६ १९४
२०१७ ९३
२०१८ ९९
२०१९ ८४
२०२० १३०
बाॅक्स
तीन वर्षात १०९५ बालके झाली कुपोषणमुक्त
जिल्ह्यात मागील तीन वर्षांमध्ये १०९५ बालकांना कुपोषणाच्या कचाट्यातून मुक्त करण्यास बालकल्याण विभाग तसेच आरोग्य विभागाला यश आले आहे. राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत बालकांसाठी विविध योजना राबविल्या जाते. त्यांना योग्य पोषण आहार तसेच औषधोपचार केला जातो. या अंतर्गत जिल्ह्यात २०१८-१९ मध्ये ५५४, २०१९-२० मध्ये ३६८ तर २०२०-२१ मध्ये १७३ अतितिव्र कुपोषित बालकांना कुपोषणातून मुक्त करण्यात आले आहे.
बाॅक्स
जिवतीत सर्वाधिक, बल्लारपुरात एकही नाही
जिल्ह्यातील तालुक्यांचा विचार केल्यास जिवती तालुक्यात सर्वाधिक म्हणजे, १४ बालकांचा समावेश आहे. तर बल्लारपूर तालुका कुपोषणमुक्त आहे. पोंभूर्णामध्ये १ अतितीव्र कुपोषित बालक आहे. तर चंद्रपूर, ब्रम्हपुरीमध्ये प्रत्येकी ७, चिमूर ९, वरोरा ६, गोंडपिपरी ८, मूल, सावली, नागभीड, कोरपना तालुक्यात प्रत्येक ४ बालके तर सिंदेवाहीमध्ये ३ बालकांचा समावेश आहे.
कोट
जिल्हा कुपोषणमुक्तीसाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत, यासाठी यंत्रणेतील प्रत्येक घटकांचे लक्ष आहे. आरोग्य तपासणी, गृहभेटी, वजन घेणे, पोषण आहार देणे, योग्य उपचार करून खबरदारी घेतली जात आहे.
-संग्राम शिंदे
उपमुख्यकार्यकारी अधिकारी, बा.क.