राजुरा : राजुरा शहर घोटाळ्याचे शहर म्हणून उदयास येत आहे. शेअर मार्केट घोटाळा, भिसी घोटाळा, आरडी घोटाळ्यानंतर आता राजुऱ्याच्या सुशिक्षित बेरोजगार युवकांना फसविल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे.राजुरा शहरातील सुशिक्षित बेरोजगार युवक सुरज कुकडे आणि विक्की मडावी हे महाविद्यालयीन युवक आहे. नागपूरच्या एका ट्रेडिंग कंपनीमध्ये या मुलांना बोलाविण्यात आले. त्यांची मुलाखत घेण्यात आली. त्यांच्याकडून प्रत्येकी १५ हजार रुपये घेण्यात आले. वाचून न दाखविता १०-१२ फोटो लावून २०- २५ स्वाक्षऱ्या व अंगठ्याचे ठसे घेण्यात आले. अत्यंत गुप्त ठिकाणी नेऊन लोकांना कसे फसवायचे हे धडे या ठिकाणी दिले जात असल्याची धक्कादायक माहिती असून पैसे घेतल्यानंतर पगार पाहिजे असल्यास चार नवीन व्यक्तींना बोलावून आणणे गरजेचे आहे, असे सांगितले जाते. चार व्यक्तीमागे १ हजार ६०० रुपये कमिशन दिले जाते. चार मुले नाही आणली तर पगार दिला जात नाही. या ट्रेडिंग कंपनीत लोकांची फसवणूक कशी करायची, या संबंधित धडे शिकविण्यात येत असल्याचे काही सुरक्षित बेरोजगार युवकांनी ‘लोकमत’ शी बोलताना सांगितले. या दोघांचेही वडील मजुरी करुन आपला उदरनिर्वाह करतात. नोकरी लागणार म्हणून १५ हजार रुपये वडिलांनी दिले. परंतु नागपूरच्या कंपनीनी आमची फसवणूक केली. या ठिकाणी इतर राज्यातील दोनशेच्या वर सुशिक्षित बेरोजगार युवक कार्यरत असून अनेकांची फसवणूक होत असल्याचेही त्यांनी सांगितले.
ट्रेडिंग कंपनी देत आहे फसवणुकीचे धडे
By admin | Updated: August 13, 2015 01:54 IST