लोकमत न्यूज नेटवर्क
बल्लारपूर : बल्लारपूर शहराची ऐतिहासिक ओळख असलेल्या वर्धा नदी तिरावरील ऐतिहासिक किल्ल्याएवढेच महत्त्व बल्लारशाहचे शेवटचे राजे खांडक्या बल्लारशहा यांच्या बामणी मार्गावर असलेल्या समाधीस्थळाचेही आहे. परंतु, या समाधीस्थळाकडे दुर्लक्ष होत असल्यामुळे समाधी इमारतीवर गवत उगवले आहे.
ही समाधी वास्तू सुमारे पाचशे वर्षांपासून याठिकाणी आहे. इमारत लहान परंतु मजबूत आणि देखणी आहे. आदिवासी बांधवांचे हे श्रद्धास्थान आहे. चार-पाच वर्षांपूर्वी बल्लारपूर नगरपालिकेने लोकसहभागातून समाधी परिसरातील कचरा हटवून परिसर स्वच्छ केला होता तसेच समाधीस्थळ इमारतीची रंगरंगोटी केली होती. त्यानंतर मात्र इमारतीवर उगवणारे गवत काढून परिसर स्वच्छ करण्याची काळजी घेतली गेली नाही. त्यामुळे इमारतीवर गवत उगवले आहेत. इमारतीवरील गवत दरवर्षी काढून परिसर स्वच्छ ठेवणे गरजेचे आहे. हे समाधीस्थळ रस्त्याच्या थोडे आत पेट्रोल पंपाच्या मागे आहे. त्यामुळे रस्त्यावरुन जाताना नजरेला पडत नाही. यामुळे बल्लारपूर-बामणी मुख्य मार्गावर समाधीस्थळ दिशादर्शक पाटी लावणे गरजेचे आहे. याकरिता जेसीज, रोटरी या सेवाभावी संस्थांनी पुढाकार घ्यावा, अशी मागणी होत आहे.