नांदाफाटा : ग्रामपंचायतीचे प्रशासकीय काम व आॅनलाईन दाखले तयार करण्यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये कंत्राटी पद्धतीने संगणक परिचालकांची २०११ मध्ये भरती करण्यात आली. मात्र सदर कर्मचाऱ्यांचे मानधन अनियमित देण्यात येत असून काहींना पाच- पाच महिने मानधनाची प्रतीक्षा करावी लागत आहे. त्यामुळे संगणक परिचालकांवर उपासमारीची वेळ आली आहे. ग्रामपंंचायतीमधून जन्म- मृत्यू, नमूना आठ, रहिवासी आदी दाखले आॅनलाईन देता यावे व कामकाजाचे आधुनिकीकरण व्हावे, या हेतुने या कर्मचाऱ्यांची प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये नेमूणक केली.साधारणता चार हजार रुपये मानधनावर हे कर्मचारी काम करीत आहे. यातच नेमणूक करताना कालांतराने कायमस्वरुपी नोकरीत सामावून घेण्याचे लॉलीपापही या कर्मचाऱ्यांना दाखविण्यात आले होते. आता पाच वर्ष लोटूनही कर्मचाऱ्यांना कंत्राटी पद्धतीनेच काम करावे लागत आहे. काही महिन्याआधी राज्यभर संगणक परिचालक संघटनेच्या वतीने आंदोेलने, उपोषणे व मोर्चा काढण्यात आला. यामध्ये कायमस्वरुपी नोकरीत सामावून घेणे, नियमित मानधन, स्टेशनरी खर्चाचा बोझा न देणे, अतिरिक्त कामाचा भार वगळणे आदी मागण्या करण्यात आल्या. या मागण्या मान्य न झाल्याने जवळपास दोन ते तीन महिने काम बंद आंदोलनही करण्यात आले. राज्याचे मुख्यमंत्री, अर्थमंत्री तथा खासदार, आमदारांना निवेदनाच्या माध्यमातून प्रश्न सोडविण्याबाबत संगणक परिचालकांनी मागणी केली. ही मागणी आश्वासनात विरली. त्यानंतर कर्मचाऱ्यांच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात आले. आणि राज्यव्यापी संपही पुकारण्यात आला. तेव्हा २०१५ मध्ये सदर कर्मचाऱ्यांना जिल्हा परिषदेमार्फत मानधन देण्यात येईल असा निर्णय शासनाने घेतला. मात्र पाच- सहा महिने लोटूनही हे आश्वासन फोल ठरल्याच्या प्रतिक्रिया या कर्मचाऱ्यांना येत आहे. निवडणुकीपूर्वी काही राजकीय पुढाऱ्यांनी संगणक परिचालकांच्या प्रश्नांना सत्तेत आल्यानंतर न्याय देऊ असे सांगितले. मात्र त्यातही निराशाच दिसून येत आहे. केवळ आश्वासनेच पदरी पडत असल्याने या कर्मचाऱ्यांची निराशा झाली आहे.(वार्ताहर)
७०० संगणक परिचालकांवर उपासमारीची वेळ
By admin | Updated: June 26, 2015 01:12 IST