केळझर येथील रवींद्र कवठे यांची शेती गावाला लागून आहे. रविवारी सायंकाळी शेतात तीन बैल बांधून ठेवले होते. रात्रीला हरणाचा पाठलाग करीत वाघ बैलांजवळ पोहचला. वाघाने शेतात बैल बांधून असलेल्या बैलांनाच आपली शिकार बनविले. वाघाने हल्ला करून दोन बैलांना जागीच ठार केले, तर एक बैल दोर तोडून पळून गेला. सकाळी शेतकरी शेतात गेला असता ही घटना उघडकीस आली. यामध्ये संबंधित शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. चिचपल्ली वनपरिक्षेत्राधिकारी वैभव राजूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली केळझरचे क्षेत्र सहायक डी. बी. मेश्राम यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. या घटनेने केळझर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वाघाचा तात्काळ बंदोबस्त करावा, अशी मागणी परिसरातून केली जात आहे.
हरणाचा पाठलाग करीत असलेल्या वाघाने केली दोन बैलांची शिकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:34 IST