भद्रावती : भद्रावती तालुक्यातील साडेतीनशे लोकवस्ती असलेल्या तेलवासा गावात मृत्यूने थैमान घातले आहे. लागोपाठ तीन दिवसांत तीन जणांचा मृत्यू झाल्याने गावकऱ्यांत भीतीचे वातावरण पसरले आहे. २४ सप्टेंबर बुधवारी रात्री ८.३० वाजताच्या दरम्यान गावातील प्रितम गौतम नगराळे या २२ वर्षीय तरुणाचा नागपूर येथील एका खासगी रुग्णालयात मृत्यू झाला. २३ सप्टेंबरला याच गावातील १५ वर्षीय विद्यार्थीनी आचल शेषराव नगराळे हिचा डेंग्युने मृत्यू झाला. तत्पूर्वी जेना येथील सागर केशव मिलमिले याचाही मृत्यू झाला. दरम्यान गावात सुमारे १५ जणांना तापाची लागण झाली आहे. प्रितम गौतम नगराळे या युवकाला चंद्रपूरवरुन उपचारासाठी नागपूरला हलविले होते. तो एका खासगी रुग्णालयात उपचार घेत होता. अविवाहीत असलेल्या प्रितमचे हरणीयाचे आॅपरेशन झाले होते. सोबतच डेंग्यु मलेरिया, काविळ आणि शिकलसेल आजाराने तो त्रस्त असल्याचे सांगण्यात आले. लागोपाठ दोन अल्पवयीन मुलांचा मृत्यू झाल्याने तेलवासा गावात शोककळा पसरली आहे. या गावालगत कोळसा खाण आहे. यामुळे प्रदूषणाने गावकरी त्रस्त आहे. तसेच वर्धा नदीवरुन आयुधनिर्माणीसाठी पाणी पुरवठा करणारी पाईप लाईन टाकली आहे. याच पाईप लाईनमधून एक नळ गावकऱ्यांसाठी दिला आहे. या नळाद्वारे नदीतील अशुद्ध पाणी गावकऱ्यांना मिळत आहे. पाण्यावर शुद्धीकरणाची प्रक्रिया होत नाही. येथील एका सार्वजनिक बोअरवेलच्या माध्यमातूनसुद्धा पाणी रोगराईला खतपाणी घालत असल्याचे गावकऱ्यांनी सांगितले. उपसरपंच अनिता बोबडे, ग्रा.पं. सदस्य मोरेश्वर जुनघरे, देवता लभाने, माजी सरपंच प्रिती कांबळे, भिमराव कांबळे, शंकर नगराळे, पवन नगराळे, शंकर कुंभरे आणि गावकऱ्यांनी सदर समस्येबाबत प्रशासनाने वेळीच उपाय योजना करावी अशी मागणी केली आहे. (तालुका प्रतिनिधी)
तेलवासा गावात तीन दिवसांत तिघांचा मृत्यू
By admin | Updated: September 25, 2014 23:21 IST