भद्रावती : नागपंचमीच्या पर्वावर भद्रावती येथील भद्रनाग स्वामींचे हजारो भाविकांनी दर्शन घेतले. पहाटेपासूनच भद्रनागाच्या दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागल्या होत्या. भद्रनागस्वामी मंदिर भद्रावती येथे १९ व २० आॅगस्टला नागपंचमी उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.१९ आॅगस्टला पहाटे ५.५१ वाजता पंचमीला प्रारंभ झाल्यानंतर भद्रनागस्वामींच्या महापूजेला सुरूवात झाली. वरोरा-भद्रावती निर्वाचन क्षेत्राचे आमदार बाळू धानोरकर व विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष डॉ. रमेश मिलमिले यांनी सपत्नीक भद्रनागस्वामींची महापूजा केली. पुजारी शैलेश जोशी यांनी विधिवत पूजा सांगितली. याप्रसंगी विश्वस्त मंडळाचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहीर यांनीही भद्रनागस्वामींचे दर्शन घेतले.यावर्षीचा नागपंचमी सण पहिल्यांदाच दोन वेगवेगळ्या तारखांना दर्शविण्यात आला होता. १९ आॅगस्टला पहाटे ५.५१ वाजता पंचमी सुरू होवून २० आॅगस्टला पंचमी सकाळी ८. ४० वाजेपर्यंत असल्याने विश्वस्त मंडळातर्फे दोन दिवस नागपंचमी उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. १९ आॅगस्टच्या तुलनेत २० आॅगस्टला भाविकांची गर्दी मोठ्या प्रमाणात दिसून आली. पाहुर्णा, संसर, छिंदवाडा, अकोट, सावरगाव येथील भाविक आदल्या रात्री येवून आंघोळ करून शेंदूर तुपात भिजवून भद्रनागस्वामींच्या मूर्तीला लावतात. नंतर कढईचा प्रसाद करून भद्रनागाच्या मूर्तीची पुजाअर्चा करतात.‘हर हर महादेव’, ‘भद्रनाग स्वामी की जय’ अशा जयघोषाने परिसर दणाणून गेला होता. सुरक्षेच्या दृष्टीने दोन दिवसांपासूनच बॉम्ब शोध पथक व श्वास पथक परिसरात तैनात करण्यात आले होते. भाविकांची गैरसोय होवू नये यासाठी विश्वस्त मंडळातर्फे व्यवस्था करण्यात आली होती. (तालुका प्रतिनिधी)
हजारो भाविकांनी घेतले भद्रनागस्वामींचे दर्शन
By admin | Updated: August 21, 2015 01:15 IST