मूल : चंद्रपूर जिल्ह्यातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना कोविड १९चे लसीकरण प्राधान्याने देण्यात यावे, अशी मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेने जिल्हाधिकारी चंद्रपूर यांच्याकडे केली आहे.
जिल्ह्यात वर्ग पाचवी ते बारावीपर्यंतच्या शाळा सुरू झालेल्या असून, शिक्षक हा नेहमी विद्यार्थ्यांच्या संपर्कात राहतो. ग्रामीण भागातील विद्यार्थी तालुक्याच्या ठिकाणी बसने जाणे-येणे करीत असतात. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने शिक्षकांना प्रथम प्राधान्याने कोविड -१९ची लस देणे आवश्यक आहे. कोरोनाच्या काळात सुरुवातीपासूनच शिक्षकांची भूमिका महत्त्वाची आहे. कुटुंब सर्वेक्षण, माझे कुटुंब माझी, जबाबदारी आदी सर्वेक्षणाचे काम शिक्षकांनी केले आहे. तसेच कोविड सेंटरवर तर होम क्वॉरण्टाइन असलेल्या रुग्णांना संपर्क करून नोंदी ठेवण्याचे काम जिल्ह्यातील शिक्षक त्यांचे नियोजित काम सांभाळून करीत आहेत. त्यामुळे शिक्षकांना प्रथम प्राधान्य देेऊन कोविड-१९ची लस देण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेने केली आहे.