चंद्रपूर : जिल्हा परिषदेअंतर्गत कार्यरत शिक्षकांचे वेतन मागील सहा महिन्यापासून अनियमित होत आहे. एक ते दोन दोन महिने उशिरा होत असलेल्या वेतनामुळे तसेच प्रशासनाच्या वेळकाढू धोरणामुळे जिल्ह्यातील शिक्षकांना आर्थिक व मानसिक मनस्ताप सहन करावा लागत आहे. या सोबतच बीएलओच्या अशैक्षणिक कामामुळे जिल्हा परिषद व नगर परिषद शिक्षक महिनाभर शाळाबाह्य राहतात. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसनीसह शिक्षकांनाही त्रास होत आहे. या विरोधात महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक समितीने ३१ आॅगस्टला जिल्हा परिषदेसमोर एक दिवसीय लाक्षणीय धरणे आंदोलन करण्याचे ठरविले आहे.शिक्षकांच्या वेतनासाठी नव्यानेच आलेल्या शालार्थ प्रणालीचे कारण वेतनासाठी होत असलेल्या विलंबाला पुढे केले जात आहे. सोबतच सदरची देयके बनविण्यासाठी शाळांना अतिरिक्त आर्थिक भारही सहन करावा लागत आहे. यामुळे शिक्षकांचे कौटुंबीक आर्थिक नियोजन पार कोलमडून जात आहे. यासह जिल्ह्यावरून वेतनाचा निधी आल्यानंतरही काही पंचायत समित्या प्रत्यक्ष खात्यावर वेतन जमा करण्यासाठी विनाकारण आठवडाभर उशीर करतात. याबाबत शिक्षण संचालक, पुणे यांनी वेळोवेळी दिलेल्या सूचनांना व संघटनेने जिल्हा व तालुका स्तरावर दिलेल्या निवेदनांना प्रशासन केराची टोपली दाखवत आहे. होत असलेल्या या सततच्या विलंबासाठी पुरोगामी शिक्षक समितीला आंदोलनाचा मार्ग पत्करावा लागला.सदर आंदोलनाची दखल घेत शिक्षणाधिकारी (प्राथमिक) संजय डोर्लीकर यांनी शिष्टमंडळाला २६ आॅगस्टला पाचारण केले. यावेळी ३१ आॅगस्टपूर्वी जुलै महिन्याचे व ५ सप्टेंबरपूर्वी आॅगस्ट महिन्याचे वेतन देण्यात येईल. तसेच त्यापुढील महिन्याचे वेतन १ तारखेलाच देण्यात येईल, असे आश्वासन दिले.बी.एल.ओ. बुथ लेव्हल आॅफीसरचे कामही शिक्षकांना विनाकारण देण्यात येत आहे. शिक्षण हक्क अधिनियमानुसार पंचवार्षीक निवडणुका व दशवार्षिक जनगणनना व्यतीरिक्त इतर कोणतेही अशैक्षणिक काम शिक्षकांना देऊ नयेत, असे स्पष्ट निर्देश आहेत. यासह राज्याचे शिक्षक संचालक व सचिव यांनीही शिक्षकांची शाळाबाह्य कामे काढून घ्यावीत. त्यांना फक्त शिकवू द्या, असे आदेश दिले असतानाही काही तहसीलदार ही कामे जबरदस्तीने शिक्षकांना सोपवित आहेत.काही जिल्ह्यात मात्र ही कामे शिक्षकांकडून काढून घेण्यात आली आहे. चंद्रपूर जिल्ह्यात जिल्हा परिषद, महानगरपालिका व नगरपालिका शिक्षकांकडे देण्यात येत असलेले बी.एल.ओ.चे काम तात्काळ काढून घेण्यात यावे, या मागणीसाठी ३१ आॅगस्टला पुरोगामी शिक्षक समितीच्या वतीने धरणे आंदोलन करण्याचे ठरविण्यात आले आहे. या आंदोलनात जिल्ह्यातील जास्तीत जास्त शिक्षकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन संघटनेच्या वतीने करण्यात येत आहे. शिक्षणाधिकारी यांच्याशी झालेल्या चर्चेच्या वेळी जिल्हाध्यक्ष विजय भोगेकर, सरचिटणीस हरीश ससनकर, कोषाध्यक्ष दीपक वऱ्हेकर, महिला प्रतिनिधी अल्का ठाकरे, चंदा खांडरे, प्रतिभा उदापुरे यांची उपस्थिती होती. (शहर प्रतिनिधी)
अनियमित वेतनामुळे शिक्षक त्रस्त
By admin | Updated: August 28, 2015 01:23 IST