ब्रह्मपुरी : तालुक्यातील दक्षिण भागातील तळाेधी-गांगलवाडी-व्याहाड हा १०० किमीचा रस्ता अवजड रेती वाहतुकीमुळे पूर्णत खड्ड्याचा झाला असून जनतेला नाहक त्रास सहन करावा लागत आहे. अनेक अपघातही घडत आहेत.
सदर रस्त्याची त्वरित दुरुस्ती करून डांबरीकरण करावे, यासाठी कृती संसाधन समितीने यशवंतराव खोब्रागडे यांच्या नेतृत्वाखाली उपविभागीय अधिकाऱ्यामार्फत राज्याचे मुख्यमंत्री यांना नुकतेच निवेदन पाठविले. या वेळी वाघाने ठार केलेल्या व्यक्तीच्या वारसास वनविभागात नाेकरी द्यावी, सातबारावरील बेदखल नाेंद रद्द करावी, ज्या शेतकऱ्यांच्या गाई, म्हशी, बैल वाघाने मारले, त्यांना त्वरित नुकसानभरपाई द्यावी, अतिक्रमित शेतकऱ्यांना कायमस्वरूपी पट्टे द्यावे, अशा मागण्याही करण्यात आल्या. उपविभागीय अधिकारी क्रांती डाेंबे यांना निवेदन देतेवेळी यशवंत खोब्रागडे, उमेश बागडे, ईश्वर जनबंधू, मोतीलाल देशमुख, शुभम चौधरी, गोकुळ जेंगठे, हेमराज इनकने, नंदकिशोर धकाते उपस्थित होते.