राज्य शासनाचा निर्णय : शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा उद्देशचंद्रपूर : जिल्ह्यातील शाळाबाह्य बालकांचे एकदिवसीय सर्वेक्षण ४ जुलैला करण्यात येणार आहे. एकही बालक या सर्वेक्षणातून सुटू नये, याची पुरेपूर काळजी घेण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिले आहेत.यासंबंधी एक बैठक बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आली. ६ ते १४ वयोगटातील प्रत्येक बालक शाळेत दाखल करणे व नियमितपणे शाळेत उपस्थित राहून दर्जेदार शिक्षण घेणे हा यामागे उद्देश आहे. जे विद्यार्थी अजूनही शाळाबाह्य आहेत, त्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणणे हा शासनाचा व शिक्षण हक्क कायद्याचा संकल्प आहे. वाड्या, वस्त्या, तांडे, बसस्थानक, रेल्वेस्टेशन, दगडखाणी, वीटभट्टी, हॉटेल, स्थलांतरीत कुटुंबे, भटक्या जमाती, वारांगणा वस्ती, कारखाने, वीजनिर्मिती केंद्र वसाहत आदी ठिकाणी सर्वेक्षण करण्यात करण्यात येणार आहे.तालुकास्तरावर व गावस्तरावर समिती गठीत करण्यात आली. सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी यांना शासननिर्णयानुसार सोपविलेली जबाबदारी पार पाडण्याकरिता निर्देश देण्यात आले आहे. या सर्वेक्षणाकरिता सर्वांनी सहकार्य करावे, असे जिल्हाधिकारी यांनी बैठकीत सूचित केले आहे. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर, अतिरिक्त जिल्हाधिकारी संजय धिवरे, मनपा आयुक्त सुधीर शंभरकर, जिल्हा समाजकल्याण अधिकारी, सहाय्यक कामगार आयुक्त, प्रकल्प अधिकारी आदिवासी विभाग, शिक्षणाधिकारी प्राथमिक रविकांत देशपांडे, उपशिक्षणाधिकारी व सर्वशिक्षा अभियानाचे जिल्हा समन्वयक उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)
४ जुलैला शाळाबाह्य बालकांचे सर्वेक्षण
By admin | Updated: June 26, 2015 01:15 IST