बल्लारपूर तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी सुरुवातीला खरिपातील कापूस पिकाची लागवड केली होती. पीक चांगले भरले होते. परंतु ऐनवेळी बोंड अळीच्या प्रादुर्भावाने ते पीकही गेले. केलेला खर्चही गेला.
या खरिपातील केलेला खर्च बी बियाणे, खते, औषधे, मशागत, मजुरांचा खर्च काढायचा कसा, या विचारात पळसगाव परिसरातील कळमना, आमडी, कवडजाई, किन्ही, कोर्टी, मानोरा, इटोली, दहेली येथील शेतकऱ्यांनी कापूस उपटून, धसकटे पेटवून चांगली मशागत करून उन्हाळी मुगाची बियाणे कृषी केंद्रातून खरेदी करून लागवड केली. मुगाला दरवर्षी सात ते आठ हजारांपर्यंत भाव असतो. उत्पादन खर्चही कमी असतो. अनेक शेतकऱ्यांनी उन्हाळी मूग पिकाची लागवड केली. त्या मुगाला पेरणीच्या वेळी खत देण्यात आले. पाण्याच्या २ ते ३ पाळ्या देखील देण्यात आल्या. परंतु खर्चाच्या मानाने पहावे तसा मूग बहरला नाही.
काही ठिकाणी व्हायरसजन्य रोगाचा प्रादुर्भाव या पिकावर दिसून येत आहे. मुगाला बघाव्या तशा शेंगा लागलेल्या दिसत नाही. कापूस व सोयाबीन सारखीच अवस्था मूग पिकाची झाली आहे. या पिकातून तरी आपला वार्षिक खर्च निघेल. डोक्यावरील कर्ज कमी होईल, या आशेने शेतकरी जगत होता. परंतु या पिकात देखील शेतकऱ्यांच्या स्वप्नाचा भंग झाल्यागत स्थिती आहे. काही शेतकऱ्यांनी शेती करण्याकरिता खासगी बँकांकडून तर काहींनी सहकारी सोसायटीकडून कर्ज उचलले आहे. कापसाने ही शेतकऱ्यांना निराश केले. थोडी आशा मूग पिकाची होती पण त्यातही तोकडे उत्पादनच मिळेल, अशी अवस्था आहे. त्यामुळे पुढील हंगामात नेमक कोणते पीक घ्यावे, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.