लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी देशात सर्वत्र लॉकडाऊन आहे. या लॉकडाऊनचे प्रत्येक गावात पालन होत आहे. चंद्रपुरातही लॉकडाऊन उत्तम पाळला जात आहे. मात्र अचानक सोमवारी हजारो नागरिक वाहने घेऊन रस्त्यावर आली आणि लॉकडाऊनचे तीनतेरा वाजले. जटपुरा गेटवर तर चारचाकी आणि दुकाकी वाहनांची लांबच लांब राग लागली होती. चंद्रपूरकरांची ही कृती निश्चितच आरोग्याच्या दृष्टीने अपायकारक ठरली.मागील सव्वा महिन्यापासून देशात लॉकडाऊन आहे. चंद्रपुरातही नागरिक लॉकडाऊन पाळत आहे. जीवनावश्यक वस्तूंची दुकाने वगळता इतर दुकाने बंद ठेवण्यात येत आहे. या लॉकडाऊनदरम्यान दररोज काही नागरिक जीवनावश्यक वस्तू घेण्याकरिता घराबाहेर पडतात. मात्र ही संख्या मोठी नसते. शिवाय सकाळी ७ ते दुपारी २ वाजेपर्यंतच दुकाने सुरू राहत असल्याने दुपारनंतर चंद्रपुरातील रस्त ओस असतात. मात्र सोमवारी अचानक चंद्रपूरकरांनी सर्व नियमांची पायमल्ली केल्याचे आढळून आले. अचानक हजारो नागरिक आपापली वाहने घेऊन रस्त्यावर आली. जटपुरा गेटवर पोलिसांचा तगडा बंदोबस्त राहत आहे. त्यामुळे शेकडो वाहनांची रांग जटपुरा गेटवर दिसून आली. नागरिकांची एवढी मोठी संख्या बघून पोलीसही चक्रावले. अखेर एक एक वाहनांची पोलिसांनी कसून चौकशी केली. ज्यांच्याकडे पास होते, त्यांना सोडण्यात आले आणि ज्यांच्याकडे कुठलेही पास आढळून आले नाही, त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. दरम्यान, पास नसणाऱ्यांची संख्या अधिक होती, असे पोलीस सुत्राने सांगितले.नेमकी किती जणांवर कारवाई केली, याबाबतचा आकडा मंगळवारी माहिती होणार आहे.अतिरिक्त एसपींकडून तपासणीचंद्रपुरात सोमवारी अचानक बहुसंख्य नागरिक घराबाहेर पडून रस्त्यावर आल्याने याची गंभीर दखल अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे यांनी घेतली. ते स्वत: ताफ्यासह जटपुरा गेटवर पोहचले. त्यांनीदेखील जटपुरा गेटवर स्वत: अनेक वाहनांची तपासणी करीत विनाकारण घराबाहेर पडणाºया नागरिकांवर कारवाई केली.मनपाचे पास मिळताच नागरिक रस्त्यावरमागील काही दिवसांपासून महानगरपालिकेद्वारे नागरिकांना बाजारपेठेत येण्यासाठी पास वितरित करण्यात येत आहे. शहरातील बहुतांश जणांना अशा पास मिळाल्या आहेत. यात कुटुंबप्रमुख आणि इतर दुसरा व्यक्ती यांचे नाव असून त्यांनाच जीवनावश्यक वस्तू घेण्यासाठी बाहेर पडता येते. मात्र एकाच दिवशी सर्व नागरिक बाहेर पडू नये म्हणून महानगरपालिकेने प्रत्येक कुटुंबाला आठवड्यात एक दिवस घराबाहेर पडण्यासाठी निश्चित करून दिला आहे. मात्र बहुतांश नागरिकांनी पासमधील दिवस बघितला नसेल आणि पास घेऊन घराबाहेर पडले असेल, अशीही शक्यता वर्तविण्यात येत आहे.