जनजीवन विस्कळीत : अनेकांच्या घरात शिरले पाणी, सिंदेवाही तालुक्यात १५३ मिमी पावसाची नोंदचंद्रपूर : गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात दमदार पाऊस सुरू असून बुधवारीही मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे अनेक लहान नदी, नाल्यांना पूर आला असून पावसाचे पाणी अनेकांच्या घरात शिरल्याने मोठे नुकसान झाले आहे. गेल्या २४ तासांत जिल्ह्यात ८० मिमी पावसाची नोंद झाली. यात सर्वाधिक पाऊस सिंदेवाही व मूल तालुक्यात झाला. बुधवारी सायंकाळी चंद्रपूर शहरासह जिल्ह्यातील गडचांदूर, घुग्घुस, कोरपना, मूल, सिंदेवाही, वरोरा, भद्रावती आदी तालुक्यात मुसळधार पाऊस झाला. पाऊण ते एक तास झालेल्या या पावसाने चंद्रपुरातील सर्व मुख्य रस्ते पाण्याखाली आहे. त्यामुळे वाहतूकदारांची मोठी तारांबळ उडाली. सिंदेवाही येथे गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने अनेकांच्या घरात पाणी शिरले. त्यामुळे अनेकांच्या घरातील जीवनाश्यक साहित्य भिजले. जयस्वाल कॉलनी, त्रिवेणी नगर, नागपूर रोड बाजुच्या वस्तीत पावसामुळे नदीचे स्वरूप आले होते. नागपूर मार्गावरील अनेक दुकानातही पाणी शिरले. त्यामुळे अनेकांचे नुकसान झाले.जिल्ह्यात अन्य भागातही बुधवारी दुपारी व रात्री पाऊस झाला. त्यामुळे नदी, नाल्यांना पूर आला आहे. पावसामुळे सिंदेवाही तालुक्यातील मोहाळी, वासेरा, शिवणी, गडबोरी, कळमगाव, गुंजेवाही हे मार्ग बंद झाले होते. (स्थानिक प्रतिनिधी)
दमदार पावसाने नदी, नाले फुगले
By admin | Updated: August 14, 2015 01:14 IST