गडचांदूर : कोरपना व जिवती या दोन्ही तालुक्यांच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या औद्योगिक शहर गडचांदूरला तालुक्याचा दर्जा देण्यात यावा, यासाठी गडचांदूर तालुका संघर्ष समितीच्यावतीने गुरुवारी खासदार बाळू धानोरकर यांना निवेदन देण्यात आले.
गडचांदूर तालुका निर्मितीची मागणी गेल्या काही वर्षांपासून सातत्याने केली जात आहे, यासाठी संघर्ष समितीच्यावतीने अनेकदा आंदोलने झाली, शासनानेसुद्धा याबाबत प्रस्ताव तयार केला आहे. गडचांदूर तालुका निर्मितीला विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना, पत्रकार संघाने समर्थन दिले आहेत. गडचांदूर हे शहर तालुकाच्या दृष्टीने शासनाचे सर्व निकष पूर्ण करत आहे, गडचांदूरपेक्षा अतिशय लहान शहराला तालुक्याचा दर्जा मिळाला आहे. केवळ राजकीय पाठबळ नसल्याने तालुका निर्मितीला अडथळा निर्माण होत आहे. तेव्हा शासनाने आता तरी गडचांदूर शहराला तालुक्याचा दर्जा द्यावा, अशी मागणी संघर्ष समितीचे संघटक उद्धव पुरी, अशोककुमार उमरे यांनी खासदार बाळू धानोरकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहेत,
सोबतच शहरात एक सुसज्ज सांस्कृतिक सभागृह निर्माण करण्याचीही मागणी करण्यात आली आहे. यावेळी चंद्रपूर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष प्रकाश देवतळे, राजुरा नगर परिषदेचे अध्यक्ष अरुण धोटे, गडचांदूर नगर परिषदेच्या अध्यक्ष सविता टेकाम, शहर काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष संतोष महाडोळे, माजी अध्यक्ष रोहित शिंगाडे, आदी उपस्थित होते.