सास्ती : राजुरा विधानसभा क्षेत्रातून जाणाऱ्या बामणी-राजुरा-लक्कडकोट व राजुरा-गडचांदूर-कोरपना-आदिलाबाद राज्य सीमा हे दोन चौपदरी रस्ते मंजूर होऊन बरेच वर्षं झाले; परंतु अजूनही त्या कामांची सुरुवात किंवा भूसंपादनाचे काम रखडलेले आहे. या दोन्ही रस्त्यांची कामे त्वरित सुरू करण्याची मागणी राजुराचे माजी आमदार सुदर्शन निमकर यांनी केंद्रीय परिवहन व महामार्गमंत्री नितीन गडकरी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
चंद्रपूर जिल्ह्यांतर्गत तेलंगणा राज्यातून व राजुरा विधानसभा क्षेत्रातून जाणारा आदिलाबाद-कोरपना-गडचांदूर-राजुरा-बामणी-कोठारी-गोंडपिपरी-आष्टी (गडचिरोली जिल्हा) या राष्ट्रीय महामार्ग क्र. ३५३-बीचे काम बामणी ते आष्टी जवळपास पूर्णत्वास आलेले आहे. परंतु अलीकडील आदिलाबाद ते गडचांदूर-राजुरा-बामणीपर्यंतचे काम अजूनही सुरू करण्यात आलेले नाही. मार्गाच्या भूसंपादनाचे कामसुद्धा रखडलेले आहे. तसेच चंद्रपूर-बल्लारशा-राजुरा-लक्कडकोट ते तेलंगणा राज्य सीमेपर्यंत असलेला चाैपदरी महामार्ग क्र. ९३०-डी या महामार्गाचे बामणी - लक्कडकोट ते राज्य सीमेपर्यंतच्या कामालाही सुरुवात झालेली नाही. याही मार्गाचे भुअर्जनाचे काम रखडलेले आहे. हे दोन्ही रस्ते अत्यंत महत्त्वाचे व आंतरराज्य वाहतुकीसाठी उपयुक्त ठरणारे आहेत. या मार्गावरून मोठ्या प्रमाणात प्रवासी व मालवाहतूक होत असते. मात्र या रस्त्यांची सध्या दैनावस्था झाली असून, नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. अनेक अपघात होऊन नागरिकांचा जीवसुद्धा जात आहे. या दोन्ही रस्त्यांच्या बांधकामाकरिता शेतकऱ्यांकडून भुअर्जनासाठीसुद्धा कुठलीही अडचण नसतानाही बऱ्याच वर्षांपासून काम रखडलेले आहे. या महत्त्वपूर्ण अशा दोन्ही रस्त्यांची कामे त्वरित सुरू करण्याची मागणी निमकर यांनी केली आहे.